'दुर्ग किंवा किल्ल्यांबद्दलचे' प्राचीन उल्लेख


'दुर्ग किंवा किल्ला' मानवजातीच्या इतिहासातील एक महत्वाचे अंग आहे. जेव्हापासून मानवाला आपल्या स्वतःची आणि मानावासोबत असणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेची जाणीव झाली तेव्हा मानवाने नैसर्गिक गुहांचा आधार घेतल्याचे पुराव्यानुसार स्पष्ट झाले आहे. मध्यप्रदेशातील 'भीमबेटका गुहा' या त्याचे उत्तम उदाहरण आहे. मानव जसा जसा विकसित होत गेलेला दिसतो तसेच विविध कालखंडात जे निरनिराळे शोध मानवाच्या आयुष्यात लागले तसे तसे स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मानवाची गरज विविध कालखंडात वेगवेगळी झालेली दिसते. त्यामध्ये या 'दुर्गांचा' विकास झालेला आपल्याला पहायला मिळतो.

मध्ययुगामध्ये महाराष्ट्रातील किल्यांना खूप मोठे महत्व प्राप्त झालेले आपल्याला दिसते. या किल्ल्यांंच्यामुळे  मराठ्यांनी मुघल सैन्याला खूप मोठा प्रतिकार केला आणि संपूर्ण भारतावर एकछत्री अंमल असलेली 'मुघल राजवट' याच किल्यांच्या जोरावर नेस्तनाबूद झालेली आपल्याला इतिहासात पहायला मिळते. ह्याच 'दुर्गांबद्दल किंवा किल्ल्यांबद्दल आपल्याला प्राचीन संदर्भ पहाणे देखील गरजेचे ठरते. प्राचीन काळामध्ये देखील किल्ल्यांबद्दल आपल्याला महत्व दिसून येते.

मध्यप्रदेशातील 'भीमबेटका गुहा'
(छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.)

अनेक राज्य या दुर्गांच्या मदतीने उभे राहिलीली आपल्याला दिसतात. विविध कालखंडात विविध राजे या दुर्गांच्या मदतीने उभे राहिलेले आपल्याला दिसतात काही वेळेस या दुर्गांच्या गमाविण्याने संपूर्ण राजसत्ता देखील उलथून पडलेल्या आपल्याला दिसतात. अशी इतिहासात अनेक उदाहरणे आपल्याला सापडतील. असे हे 'किल्ले' यांचे महत्व आपल्याला प्राचीन कालखंडापासून पहायला मिळते. 

प्राचीनकाळी 'दुर्ग' ही एकच संज्ञा वापरली जात असे आपल्याला दिसते. परंतु मध्ययुगात किल्ल्यांचे महत्व अधिक वाढल्याने दुर्ग, गड, किल्ले हे शब्द सर्रास वापरले गेलेले आपल्याला दिसतात तेच शब्द आजही वापरात आहेत. मुळात दुर्ग, गड, किल्ले, आणि कोट हे शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. एकंदरीतच या 'दुर्गांचे' महत्व प्रत्येक कालखंडात किती महत्वाचे होते हे आपल्याला दिसून येते.

छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मध्ययुगामध्ये महाराष्ट्रातील किल्यांना खूप मोठे महत्व प्राप्त झालेले आपल्याला दिसते.

ऋग्वेदामधील दुर्गांचा उल्लेख:-

किल्ल्यांसंबंधित प्राचीन उल्लेख हा ऋग्वेदामध्ये आपल्याला आढळून येतो. ऋग्वेदामध्ये कडेकोट बंदोबस्त असलेल्या दुर्गांचे अनेक उल्लेख आढळून येतात. यामध्ये ऋग्वेदात ५ व्या मंडलातील सुक्त ३४ ऋचा ७ आणि ऋग्वेदात ७ व्या मंडलातील सुक्त २५ ऋचा २ (५.३४.७; ७.२५.२) यामध्ये आलेला उल्लेख पुढीलप्रमाणे आहे. एका ठिकाणी तर चिरेबंदी कोट असलेल्या नगरांचा उल्लेख हा केलेला आपल्याला बघायला मिळतो (४.३०.२). अशा कोट असलेल्या नगरांना 'पूर' असे संबोधतात. 

तसेच वी.आर.रामचंद्र त्यांच्या 'वॉर इन एन्शिअंट इंडिया' यांनी ऋग्वेदातील उल्लेख त्यांच्या पुस्तकात लिहिलेला आपल्याला पहायला मिळतो तो पुढीलप्रमाणे:-

"Going back to Rigveda Samhita we find tribes living in fortification known by the name 'pur' an earth-work strengthened by a stone wall. There are numerous references to such kinds of fortress buildings which were besieged and destroyed by the invading hosts. In the later Bramhan Literature also there is distinct reference to existence of forts. In the annual sacrifice portion of the Aitareya Bramhana the three agnis of fires are described as forming three forts to prevent the Asuras from disturbing the sacrifies

अश्या प्रकारे हे उल्लेख आपल्याला खूप महत्वाचे ठरतात त्यावरून त्याकालखंडातील किल्ल्यांचे महत्व आपल्याला समजण्यास मदत होते. तसेच ऋग्वेदात शंबर आणि वेदिकांशी जे संघर्ष झाले त्याबाबत ऋग्वेदामध्ये ऋषींच्या विविध ऋचा आहेत त्यामध्ये शंबरने पर्वतावर अनेक दुर्ग बांधून हा संघर्ष केल्यावर अखेरीस तो मारला गेला. यामध्ये आपल्याला ऋग्वेदात देखील 'गिरीदुर्गांंना' किती महत्व होते हे दिसून येते. 


'लोहमय दुर्ग' नष्ट केले म्हणून 'इंद्राला' 'पुरंदर' नाव मिळाले असे म्हटले जाते.
(छायाचित्र मोबाईलने काढले आहे) 

तसेच अजून एक जो ऋग्वेदात आपल्याला उल्लेख आढळतो तो म्हणजे 'वृंगदाचे' शेकडो दुर्ग नष्ट करण्यात 'ऋजिश्वान' यशस्वी झाला होता (१.५३.८) 'वामदेव ऋषींना' लोहमय किल्ल्यात ठेवले असतानाही ते श्येन पक्ष्याच्या वेगाने बाहेर आले असा सरळ उल्लेख आपल्याला ऋग्वेदात मिळतो. यावरून 'लोहमय' किल्ला हा किती बळकट आणी अभेद्य असावा असे मानण्यास नक्कीच हरकत नाही. ऋग्वेदात आपल्याला हा देखील उल्लेख मिळतो कि 'इंद्राने' असे अनेक 'लोहमय दुर्ग' नष्ट केलेले आहे. हे 'दुर्ग' पाडल्यामुळे 'इंद्राला' 'पुरंदर' नाव मिळाले असे म्हटले जाते. म्हणून वरील सर्व उल्लेखावरून वेदकाळात युद्धतंत्राच्या दृष्टीने दुर्गांंना खूप महत्व होते असे दिसून येते. वेदकाळातील किल्ल्यांच्या प्रकारासंबंधी थोडीफार कल्पना ही मनुस्मृतीमध्ये आलेल्या 'दुर्गांच्या' माहितीवरून करता येईल.

मनुस्मृतीमध्ये आलेला दुर्गांचा उल्लेख:-

मनुस्मृतीमध्ये सातव्या अध्यायात दुर्गांसंबंधी चर्चा आलेली आहे प्रचीनातेच्या दृष्टीने दुर्गांचे प्रकार आणि दुर्गांचीशक्ती किती महत्वाची आहे हे सांगितलेले आपल्याला दिसते. त्यामध्ये जे महत्वाचे श्लोक आपल्याला आढळून येतात ते पुढीलप्रमाणे:-

ततो दुर्गं च राष्ट्रं च लोकं च सचराचरम् |
    अन्तरिक्षगतांश्चैैव मुनीन्देवांश्च पीडयेत् ||२९||

श्लोकाचा अर्थ:- 

राजाच्या नाशानंतर किल्ला, राज्य आणि स्थावर जंगम प्रजा आणि अंतरिक्षात राहणारे पक्षी आणि वायू वगैरे देवता आणि सर्व मुनींना त्या अधर्मी राजाचा दंड पिडीत करतो. 

धन्वदुर्गंं महीदुर्गमब्दुुर्गंं वार्क्षमेव  वा |
    नृदुर्गंं गिरीदुर्गंं वा समाश्रित्य वसेत्पुुरम् ||७०||  


श्लोकाचा अर्थ:-

जेथे धनदुर्ग, महिदुर्ग, अब्दुर्ग (जलदुर्ग), वृक्षदुर्ग, नृदुर्ग, गिरिदुर्ग किंवा सेना दुर्ग आहे अशा दुर्गांचा आश्रय घेऊन गाव वसवावे.

मनुस्मृतीमध्ये हे सहा दुर्गांचे प्रकार दिलेले आपल्याला दिसतात. हे दुर्गांचे सहा प्रकार पुढीलप्रमाणे:-

१. धनदुर्ग:-
सभोवार वीस कोसपर्यंत पाण्याचा पुरवठा नसणारा दुर्ग.

२. महिदुर्ग:-
ज्याला बारा हातांपेक्षा अधिक उंचीचे, युद्धाचा प्रसंग आल्यास ज्यावरून व्यवस्थित फिरता येईल आणि झरोक्यांनी युक्त असलेल्या खिडक्या (जंग्या) ठेवलेल्या आहेत, अशा तटांनी युक्त असलेला दुर्ग.

३. अब्दुर्ग (जलदुर्ग):-
सभोवार भरपूर पाण्यामुळे नैसर्गिक संरक्षण मिळालेला दुर्ग.

४. वृक्षदुर्ग:-
तटाच्या बाहेर चारही बाजूला चार कोसपर्यंत मोठाले वृक्ष, काटेरी झाडे, आणि वेलीच्या जाळ्या यांनी वेष्टिलेला दुर्ग.

५. नृदुर्ग:-
हत्ती, घोडे, रथ, पायदळ या चतुरंग सेनेने रक्षण केलेला दुर्ग.

६. गिरिदुर्ग:-
डोंगरी उंचवट्यावर पुरेसा पाणी पुरवठा असणारे, झाडे आणि धान्य पिकवता येईल असे, पण जाण्यासाठी सहसा एखादीच वाट असणारे स्थान. 

डोंगरी उंचवट्यावर पुरेसा पाणी पुरवठा असणारे, झाडे आणि धान्य पिकवता येईल असे, पण जाण्यासाठी सहसा एखादीच वाट असणारे स्थान. 

सर्वेण तु प्रयत्नेन गिरीदुर्गंं स्मश्रयेत् |
   एषां हि बाहुगुण्येन गिरीदुर्गंं विशिष्यते || ७१||

श्लोकाचा अर्थ:-

या सहा प्रकारच्या दुर्गांमध्ये 'गिरिदुर्ग' हा अत्यंत श्रेष्ठ. म्हणून राजाने गिरीदुर्गाचा आश्रय संकटकाळी घ्यावा. 

त्रीण्याद्यान्याश्रितास्त्वेषां मृगगर्ताश्रयाsप्सरा: |
त्रीष्युत्तराणि क्रमशः प्लवग्डमनरामरा: ||७२||  

श्लोकाचा अर्थ:-

ह्या सहा प्रकारच्या किल्ल्यात सहा प्रकारचे प्राणी राहतात. ह्यातील धनदुर्गात मृग, महिदुर्गात मुंगुस इत्यादी, अब्दुर्गात म्हणजेच जलदुर्गात अप्सरा आणि जलचर, वृक्षदुर्गात वानर, नृदुर्गात मनुष्य, आणि गिरीदुर्गात किंवा पहाडदुर्गात पर्वतवासी देवजाती असतात तसेच  गिरीदुर्गांंना देव आपले निवासस्थान समजतात.

यथा दुर्गाश्रितानेतान्नोपहिंसन्ति शत्रवः|
तथाsरथो न हिंसन्ति नृपं दुर्ग समाश्रितम ||७३||  

श्लोकाचा अर्थ:-

जसे ज्या दुर्गवासियांना व्याघ्रादि शत्रू पीडा देऊ शकत नाही तसेच दुर्गाचा आश्रय घेणाऱ्या राजाला शत्रूपक्षीय राजे पीडा देऊ शकत नाही.

एक: शतंं योधयति प्राकारस्थो धनुर्धर:|
शतं दशसहस्त्राणि तस्माद् दुर्गंं विधीयते ||७४|| 


दुर्गांच्या आश्रयाने लढणारा एक एक योद्धा हा बाहेरील शंभर मनुष्यांशी युद्ध करू शकतो.

श्लोकाचा अर्थ:-

दुर्गांच्या आश्रयाने लढणारा एक एक योद्धा हा बाहेरील शंभर मनुष्यांशी युद्ध करू शकतो तसेच दुर्गाच्या आश्रयाने शंभर योद्धे हे बाहेरील दहा हजार योध्यांशी युद्ध करू शकतात.

तस्यादायुधसंम्पन्नं धनधन्येन वाहनै: |
ब्राम्हणैै: शिल्पभिर्यन्त्रैैर्यवसेनोदकेन च ||७५||

तस्य मध्ये सुपर्याप्तंं कारयेद् गृहमात्मन: |
गुप्तं सर्वर्तुकं शुभ्रं जलवृक्षसमन्वितम् ||७६||

श्लोकाचा अर्थ:-

राजाने किल्ल्यामध्ये विविधप्रकारची आयुधे, विविध धनधान्ये, वाहने, ब्राम्हण, लोहार, सोनार इत्यादी अनेक विविध शिल्पकला येणारे लोकं, यंत्रे, गवत आणि विपुल जल यांचा संग्रह करावा. तसेच किल्ल्यात स्त्रीगृह, देवागार, आयुध मंदिर, अग्निशाला आणि भीतीने रक्षलेले आणी सर्व ऋतुमध्ये फल, पुष्पादियुक्त आणि रंग लावलेले तसेच पाणी आणि वृक्ष युक्त आपले घर बनवावे.

राजाने किल्ल्यामध्ये विविधप्रकारची आयुधे, विविध धनधान्ये, वाहने, ब्राम्हण, लोहार, सोनार इत्यादी अनेक विविध शिल्पकला येणारे लोकं, यंत्रे, गवत आणि विपुल जल यांचा संग्रह करावा. 

हे संपूर्ण वर्णन दुर्ग समृध्द कसा ठेवावा याबाबतचे वर्णन मनुस्मृतिकार आपल्या मनुस्मृती मध्ये करतो.

सिंधू संस्कृती:-

विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात सिंधू संस्कृतीचा शोध लागला आणि या संस्कृतीच्या शोधामुळे संपूर्ण जगाचे डोळे दिपून गेले. या गोष्टीने एक महत्वाची गोष्ट झाली ति म्हणजे भारताला अलेक्झांडर पूर्वीचा इतिहास नाही असे ज्यांचे म्हणणे होते त्यांची तोंडे मात्र या शोधाने गप्प झाली असो, या सिंधू संस्कृतीचा कालखंड हा इ.स.पू. ३२०० च्या मागे जातो आहे हे नव्याने सिद्ध झाले आहे आजही तेथे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे.  

या सिंधू संस्कृतीची वसाहत रचना आपण पहायला गेलो तर त्यामध्ये शहरे, लहानमोठी गावे, खेडी आणि वस्त्या यांचे अवशेष आहे. सिंधू संस्कृतीमधली शहरे ही अत्यंत योजनाबद्ध होती. त्यामध्ये एका बाजूला जे शासनकर्ते किंवा राज्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी तेथे 'बालेकिल्ला' (Citadel) बांधलेला होता आणि दुसऱ्या बाजूला सामान्य लोकांसाठी 'सामान्य वस्ती' उभारलेली होती ज्याला आज 'लोअर सिटी' असे म्हणतात.

सिंधू संस्कृतीचे शासनकर्ते किंवा राज्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी तेथे 'बालेकिल्ला' (Citadel) बांधलेला होता.
(छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.)

संपूर्ण वसाहतीला तटबंदी बांधलेली होती. अश्याप्रकारे धोलाविरा आणि कच्छ मधील रचना थोडीशी वेगळी पाहवयास आपल्याला मिळते. यामध्ये ईशान्येकडील कोपऱ्यात 'बालेकिल्ला' (Citadel) हा असून तो १५० x १५० मीटर (५०० x ५०० फुट) एवढा आहे. तेथे एका बाजूस शासनकर्ता आणि दुसऱ्या बाजूस अधिकाऱ्यांची निवासस्थाने पहायला मिळतात. तसेच बालेकिल्ल्याच्या बाहेर उत्तरेच्या बाजूस काही अंतर सोडून कारागीर आणि शेतकरी आणि इतर मंडळींची वस्ती होती. याच भागाला लागून कामगार लोकं येथे राहात असत. या दोघांच्या मध्ये एक भिंत होती. अशीच रचना ही हडप्पा आणि मोहंजोदारो या सिंधूसंस्कृतीच्या रचनेमध्ये दिसून येतात. 

या प्राचीन दुर्ग अवशेषांमुळे सिंधू संस्कृतीला दुर्गांच्या इतिहासात खूप महत्व आहे. अत्यंत प्रगत नगररचना आपल्याला या संस्कृतीमध्ये किल्ल्याच्या आजूबाजूला दिसून येते.

महाभारत:-

महाभारतामध्ये दुर्ग आणि त्यामधील वास्तूविषयी खूप माहिती आलेली आपल्याला पहायला मिळते. महाभारताच्या शांतीपर्वात ही माहिती आपल्याला मिळते. यामध्ये जो उल्लेख मिळतो तो असा "भीष्मांच्या मते पुरुषसंचयासारखा दुसरा कोणताही कोष राजाला श्रेष्ठ नाही, आणि शास्त्रांमध्ये जे सहा दुर्ग सांगितले आहेत त्यामध्ये 'नरदुर्ग' हा दुर्भेद्य म्हणून सांगितला आहे.

युधिष्ठिराने परत भीष्मांना प्रश्न विचारला आहे तो असा कि राजाने जेथे राहावयाचे, ते नगर कशा प्रकारचे असावे किंवा नवीन बांधावयाचे झाल्यास ते कोणत्या प्रकारे बांधावे? याबद्दल भीष्म सांगतात ते पुढीलप्रमाणे; "विशेषतः दुर्ग कसे असावेत ते सांगतो. ते ऐकून तु तशा प्रकारचे दुर्ग बांधून त्यांच्या आश्रयाने नगरे वसवावीत, त्यामध्ये सर्व प्रकारची संपत्ती असावी आणि पुष्कळ लोकं राहण्याची व्यवस्था असावी.

याला जरासंध का आखाडा असे राजगिर येथील लोकं म्हणतात. 
आजही या ठिकाणी उत्खननाचे काम चालू आहे.
(छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.)

हे दुर्ग कसे असावेत याबद्दल त्यांनी सांगितले आहे दुर्ग, भूदुर्ग, गिरीदुर्ग, मनुष्यदुर्ग (नगरासभोवती मनुष्यांचा पहारा ठेवणे), मृदुर्ग (नगराभोवती मृत्तिकेचा तट घालणे) आणि वनदुर्ग (नगराभोवती दुर्गम अरण्य करणे) हे दुर्गांचे सहा प्रकार आहेत. यापैकी कोणत्यातरी दुर्गाने युक्त असणारे धान्य आणि आयुधे यांनी परिपूर्ण असलेले तट आणि खंदक बळकट असलेले हत्ती, अश्व, आणि रथ यांनी व्याप्त असलेले विद्वान अश्या शिल्पकारांचे वास्तव्य असलेले वस्तूसंग्रहाने संपन्न असलेली संग्रहालये. 

तसेच अत्यंत दक्ष अशा धार्मिक लोकांचे वास्तव्य असलेले बलसंपन्न मनुष्य, गज, अश्व आणि रथ यांनी युक्त असणारे चव्हाटे आणि बाजार यांनी सुशोभित असलेले, प्रकटपणे व्यवहार चालणारे, शांतीचे वास्तव्य असणारे कोठूनही भीती नसलेले कीर्तिसंपन्न, गीतावाद्यादी ध्वनीनी युक्त असलेले प्रशंसनीय अशी गृहे असलेले शूर आणि द्रव्यसंपन्न अशा लोकांनी पूर्ण असलेले वेदघोषाने दुमदुमून राहिलेले, सभा आणि उत्सव यांनी युक्त असणारे आणि सदैव देवतांची पुजा होत असलेले जे नगर, त्यामध्ये अमात्य आणि सैन्य ही ज्याला वश आहेत अशा राजाने स्वतः प्रवेश करावा. नगरातील लोकांना बाहेर जाता यावे यासाठी लहान लहान दारे ठेवावीत आणि त्यांचे संरक्षण करावे. दरवाजावर सर्व संग्रामासंबंधी आयुधे नेऊन ठेवावीत. दुर्गांच्या जवळ सैन्याचा तळ असावा.

तसेच श्रीकृष्णाने द्वारका नगरीचे वर्णन करताना म्हटले आहे:-

स्त्रियोsपि यत्र युद्धेरन् किमु वृष्णिमहारथा: ||


द्वारका नगरीचे अस्तित्व शोधायचा प्रयत्न.
 (छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.)

श्लोकाचा अर्थ:-

दुर्गांच्या मदतीने तेथील बायकासुद्धा लढू शकतील, मग आमचे महारथी लढतील यात नवल ते काय?

वरील सर्व वर्णन हे महाभारतामध्ये असून यामध्ये दुर्गरचना आणि नगररचना काय असावी याबद्दल खूप माहिती दिलेली आढळते.

शुक्रनिती:-

शुक्रनीतीमधील चवथ्या अध्यायामधील सहाव्या प्रकरणात असलेला दहावा श्लोक प्राचीन भारतीय राजनीतीशास्त्रातील दुर्गांचे महत्व सांगणारा आहे. या श्लोकाला अनुसरून प्रत्येक राज्यकर्त्यांनी नावे दुर्ग बांधलेले दिसतात आणि जुन्या दुर्गांची डागडुजी केलेली आपल्याला दिसते. शुक्रनिती मध्ये बालेकिल्ल्यात सभा किंवा दरबार दालने किंवा राजसभा असावी असे सांगितलेले आहे. बालेकिल्ल्याच्या भोवताली तट किंवा खंदक असावेत असेही सांगितले आहे. तटबंदीच्या आत आणि पश्चिम आणि उत्तरेकडे भागात सैन्याचे तळ असावेत, तर पूर्व आणि दक्षिण भागात सैन्याच्या अधिकाऱ्यांची कार्यालये असावीत असे वर्णन केलेले आढळते.

शुक्रनीतीच्या पी.डी.एफ. चे मुखपृष्ठ.
कौटिल्य अर्थशास्त्र:-

राष्ट्ररक्षणासाठी सैन्याची गरज असते आणि या सैन्यास उपयोगी पडतील अशा ज्या वास्तू त्या सैनिकी वास्तू होय. यामध्ये सर्वात महत्वाचे स्थान हे दुर्गांचे. शत्रूने हल्ला केला असता त्यापासून जनपदांचे, कोशाचे, धान्याचे, आणि इतर बहुमुल्य गोष्टींचे रक्षण करण्यासाठी दुर्गांची गरज असते. शत्रूला आपल्या राज्यात विना अटकाव प्रवेश करता येऊ नये म्हणून राज्याच्या सीमेवर 'दुर्ग' उभारलेले असतात. 

कौटिल्याने दुर्गस्थापत्याचे आठ प्रकार दिलेले आहेत. पुराणात आणि मध्ययुगीन शिल्पशास्त्राच्या ग्रंथांमध्ये नऊ प्रकारच्या दुर्गांची माहिती आपल्याला मिळते. दुर्गांचा नववा प्रकार म्हणजे 'मनुष्यदुर्ग' मनुष्यदुर्गाबाबत महाभारतात उल्लेख आढळतात. दुर्ग बांधण्याचा खर्च कमी व्हावा म्हणून 'दुर्ग' जेथे बांधावयाचे तेथील निसर्गाचा अभ्यास करून त्यास अनुकूल असा दुर्गाचा प्रकार निर्माण करावा असा एक सोपा सल्ला कौटिल्य  देतो. 

'चंद्रगुप्त मौर्य' याच्या राजवाड्याचे अवशेष मिळाले त्याची रचना. 
(छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.)

जनपदाच्या हद्दीवर चारी दिशांना निसर्गाने  बनविलेले, युद्धासाठी सज्ज असे 'दुर्ग' स्थापन करावेत. बेटावर असलेला किंवा पाण्याने वेढलेला भूभाग असे (दोन प्रकारचे) 'जलदुर्ग' बनवावेत. खडकांनी बनलेला किंवा  गुहेच्या स्वरूपाचा असे (दोन प्रकारचे) 'पर्वतदुर्ग' बनवावेत. जल व झुडपे यांनी विरहीत असलेला किंवा  क्षारयुक्त जमिनीच्या स्वरूपाचा असे (दोन प्रकारचे) धन्वदुर्ग अथवा दलदल व पाणी असलेला किंवा दाट झुडपांनी वेष्टिलेला असे (दोन प्रकारचे) 'वनदुर्ग' स्थापन करावेत.

निरनिराळ्या प्रकारच्या दुर्गांचा कोणाच्या रक्षणार्थ उपयोग करावयाचा तेही कौटील्य देतो. “नदीदुर्ग (जलदुर्ग) आणि पर्वतदुर्ग ही जनपदाच्या रक्षणार्थ असलेली ठिकाणे आणि धन्वदुर्ग आणि वनदुर्ग ही अरण्यवासींनी राहावयाची ठिकाणे किंवा  संकटसमयी आश्रयार्थ  येण्याची ठिकाणे असे वर्णन आपल्याला आढळते.

कौटिल्य त्याच्या अर्थशास्त्रात फक्त दुर्गांच्या प्रकारांची माहिती देऊन थांबलेला आपल्याला दिसत नाही तर त्याने या दुर्गांमध्ये आपल्याला तुलना केलेली पहायला मिळते आणि यातून श्रेष्ठ दुर्ग कोणता हे देखील तो आपल्याला विविध माहितीमधून दाखवून देतो. यामध्ये कौटिल्य सांगतो कि डोंगरी किल्ला जिंकणे अत्यंत अवघड तर भुईकोट किल्ला जिंकणे त्यामानाने खूप सोपे असे वर्णन कौटिल्याने सप्रमाण माहितीसहित कौटिल्य अर्थशास्त्र या ग्रंथात केलेले आहे.

मौर्यकालीन नगररचनेतील लाकडी तटबंदी. कुमराहार उत्खनन.  
(छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.)

दुर्गांचा भक्कम आधार असलेल्या राज्यांमध्ये एकाला भुईकोट किल्ल्याचा आणि दुसऱ्याला पाणकोट किल्ल्याचा आधार असल्यास त्यापैकी भुईकोट किल्ला असलेल्यापासून भूमीचा अधिक लाभ होणे हे श्रेयस्कर हे कौटिल्याने लिहिलेले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भुईकोट किल्ल्याला वेढा घालणे आणि उध्वस्त करणे किंवा हल्ले चढवणे हे अधिक सोपे असते कारण त्यातून शत्रूला निसटून जाता येत नाही. परंतु पाणलोट किल्ला जिंकण्यास अधिक कष्ट आहेत यामध्ये पाणी पार करून मग किल्ल्यावर हल्ला करावा लागतो.

नदीदुर्ग आणि पर्वतदुर्ग असलेला त्यापैकी नदीदुर्ग असलेल्यापासून त्या जमिनीचा लाभ घेणे कधीही सोयीचे ठरते त्यामुळे अश्या राज्याला जिंकणे कधीही सोपे असते. त्याचे मुख्य कारण म्हणजे हत्ती, लाकडी ओंडक्यांचा पूल, बंधारे आणि नावा (होड्या) यांनी सहज नदीदुर्ग पार करता येतो आणि त्याच्याजवळ जाऊन लढा देणे सोपे असते. याउलट पर्वतावर असलेला किल्ला रक्षण करण्यास सोपा तसेच पर्वतदुर्ग हा वेढा देण्यास अत्यंत कठीण आणि चढण्यास अत्यंत कष्टप्रद असल्यामुळे त्याच्या एका भागाला जरी खिंडार पडले तरी संपूर्ण किल्ला उध्वस्त होत नाही. तसेच कौटिल्य पर्वतदुर्गाबद्दल असे देखील म्हणतो कि या किल्ल्यावरून वरच्या बाजूने दगड आणि झाडे यांचा जोरदार मारा शत्रूवर करता येतो(७.१०.३१-३३). तसेच कौटिल्य असेही म्हणतो "भुईकोट, पाणकोट, आणि पर्वतावरील किल्ल्यांपैकी अधिक बळकट किल्ला हा पर्वतदुर्ग होय."(७·१२·२).

पर्वतावरील किल्ल्यांपैकी अधिक बळकट किल्ला हा पर्वतदुर्ग होय.

कौटिल्य किल्ल्याबाबत अधिक माहिती देतो या वर्णनामध्ये तो म्हणतो "दुर्ग जनपदाच्या मध्यभागी राज्यातील उत्पन्न जमा करण्याचे ठिकाण म्हणून वसवावा". या वसवलेल्या शहराला स्थानीय असे म्हणतात. हे स्थानीय खुष्कीचे मार्ग आणि जलमार्ग यांनी जोडलेले असावेत. हे शहर प्राकार आणि खंदक (परिखा) यांनी संरक्षित असे शहर असावे. या शहराभोवतीच्या खंदकात पाणी तुडुंब भरलेले असावे. षे संपूर्ण शहर हे नद्याच्या संगमापाशी किंवा नैसर्गिक तलावाजवळ किंवा कृत्रिम तलावाजवळ असावे.

संपूर्ण शहराभोवती दोन दोन मीटर अंतरावर तीन खंदक २८, २४, आणि २० मीटर रुंदीचे खणावेत. त्यांची खोली ही रुंदीच्या पाऊणपट किंवा अर्धी असावी. ते संपूर्ण दगडांनी बांधलेले असावे किंवा त्याच्या बाजू दगड किंवा विटा यांनी बांधलेल्या असाव्यात. त्यांना जिवंत पाण्याचे झरे लागलेले असावेत किंवा दुसऱ्या बाजूने पाणी सोडून त्यात पाणी भरलेले असावेत. जास्त झालेले पाणी वाहून जाण्यासाठी त्यामध्ये चराची रचना असावी किंवा दुसरे मार्ग असावेत. या खंदकामध्ये कमळे आणि मगरी असाव्यात" (२·३·४).

संपूर्ण शहराभोवती असलेल्या आणि पाण्यानी वेढलेल्या तीन खंदकांचे कौटिल्य वर्णन करतो तसेच पुराणांमध्ये शहराभोवती केवळ तीनच खंदक नसून प्रत्येक खंदकापाशी तट असे तीन प्राकार असत असे. ही वर्णने पुराणात आपल्याला आढळून येतात. यामध्ये जर शहर अजून सुरक्षित करायचे असेल तर प्राकार आणि खंदक यांची संख्या जवळपास सात होते. 

दुर्ग जनपदाच्या मध्यभागी राज्यातील उत्पन्न जमा करण्याचे ठिकाण म्हणून वसवावा
(छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.)

खंदकापासून चार दंडाच्या अंतरावर आतमध्ये सहा दंड उंच आणि बारा दंड उंच असा तट बांधावा. हा संपूर्ण तट खाली रुंद आणि वरच्या बाजूस निमुळता होत गेलेला असावा किंवा खालीवर सारखाच असावा. या तटाच्या भिंतीमध्ये माती घालून हत्ती आणि बैल यांच्याकडून तुडवून घ्यावी आणि मग तटावर काटेरी झाडे विषारी वेली लावाव्यात. नवीन मातीने तटाची छिद्रे भरून काढलेली असत.

किल्ल्यांच्या तटाबद्दल कौटिल्य माहिती देतो कि तटाच्या (वप्राच्या) वर रुंदीच्या दुप्पट उंची असलेली २४ हातांपर्यंत म्हणजेच (६ ते १२ मीटर) पर्यंत कोणत्याही विषम किंवा सम संख्या असलेल्या हातांच्याइतक्या उंचीची विटांची भिंत (प्राकार) बांधून घ्यावी. किल्ल्याच्या तटावर रथ चालविता येईल अशी वाट असावी तसेच या वाटेच्या कडेला तालवृक्षाच्या मुळाप्रमाणे किंवा मृदुंगाप्रमाणे किंवा मर्कटाच्या म्हणजेच माकडाच्या डोक्याच्या आकारासारखे दगडाचे कठडे बांधावेत किंवा मोठमोठ्या दगडांनी रचलेली दगडी भिंत बांधून घ्यावी, परंतु लाकडाची भिंत कधीही करू नये कारण लाकडाला अग्नीने भस्मसात करण्याचे भय असते (२·३·७-९).

कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये म्हणतो कि तीस दंड अंतरावर तटाची जितकी रुंदी असेल तितक्याच उंचीचा चबुतरा करावा, आणि त्याच्यावर चढायला आणि उतरण्यासाठी जीना तयार करावा. तटांच्यावरील दोन चबुतर्‍यांंच्या मध्ये तटाच्या रुंदीच्या दीडपट लांबीची व दोनमजली देवडी बांधावी. कौटिल्य अर्थशास्त्रा प्रमाणे किल्ल्याची  संरक्षण व्यवस्था अधोच्छंद काटच्छेद “विषम व समसंख्या असलेल्या हातांइतक्या उंचीची भिंत” याचा अर्थ  भिंतीची कमीतकमी उंची बारा हात व दोन दोन हातांनी वाढ करून ती २४ हातांपर्यंत न्यायची, म्हणजे  भिंतीची उंची १२, १४, १६, १८, २०, २२ किंवा २४ हात, या सात प्रकारांपैकी कोणतीही एक ठेवावयची. ही झाली समसंख्या असलेल्या उंचीची भिंत. भिंतीची कमीतकमी उंची ११ हात व दोन दोन हातांनी तिच्यामध्ये वाढ करून ती २३ हातांपयंत न्यायची, म्हणजे भिंतीची उंची ११, १३, १५, १७, १९, २१, किंवा २३ हात ठेवावयाची; ही झाली विषम  संख्या असलेल्या उंचीची भिंत. हा शिल्पशास्त्रांतील वाक्यप्रयोग आहे तेव्हा त्या दृष्टीकोनातून हे  सर्व  समजून घेणे महत्वाचे आहे.
कौटिल्य अर्थशास्त्राप्रमाणे किल्ल्याची संरक्षण व्यवस्था अधोच्छंद काटच्छेद


बुरुजांच्या आणि वाड्यांच्या मध्यामध्ये 'इंद्रकोश' नावाचे ३ धनुर्धाऱ्यांंसाठी लढण्याचे ठिकाण करावे ते धनुर्धारी व्यवस्थित बसतील एवढी पुढे काढलेली खिडकी असावी तसेच या खिडकीच्या झडपांना मोठे भोक असावे त्याचे मुख्य कारण म्हणजे या खिडक्या वाटेल तेव्हा उघडता आणि बंद करता यावे. किल्ल्याच्या तटाच्या मध्ये मध्ये दोन हात गुप्त रस्ते तटाच्या अनुरोधाने किंवा तटाच्या कडेपासून ८ हात अंतरावर असावेत त्याला 'देवपथ' अशी संज्ञा कौटिल्याने वापरलेली आहे. एक किंवा दोन दंड रुंदीच्या चर्या म्हणजेच वर खाली जाण्याचे मार्ग बनवावेत. तसेच शत्रू हल्ला करणार नाही अश्या ठिकाणी 'प्रधावनिका' म्हणजेच तटाच्या बाहेरच्या बाजूस सैनिकांसाठी सुरक्षित मार्ग आणि 'निष्कीरद्वार' म्हणजेच आतून 'प्रधावनिकेत' येण्यासाठी चोर दरवाजा देखील करून घ्यावा.

तटाच्या बाहेरच्या बाजूस निघून जाण्यास जशी गुप्त वाट असावी त्याच गुप्त वाटेमध्ये 'जानू-भज्जिनी' म्हणजेच हात मोडणारे शूळ, प्रकर, कल्पकुट, इत्यादी घातक शस्त्रे, काटे, सापाच्या हाडांचे सांगाडे, तालपत्र, शृंगाटक, कुत्र्याचे दात ही सर्व हत्यारे आडवीतिडवी ठेवलेली असावीत. या वाटेच्या दाराला दोन्ही बाजूने कमानी बांधून सहा हात रुंदिचा दरवाजा सहा रस्त्यांना एक असा बांधावा. तसेच याच्यावर कौटिल्य असेही सुचवतो कि दरवाजांंमधिल अंतर वीस हातांंपासून बत्तीस हातांपर्यंत असावे. यामध्ये दरवाज्याची उंची ही आठ हात असावी किंवा रुंदीपेक्षा १/६ किंवा १/८ ने अधिक असावी. किल्ल्याच्या तटामध्ये एक वाडा असावा. या वाड्याचे खांब हे पंधरा हातांपासून अठरा हातांपर्यंत उंच असावेत. त्यामध्ये खांबाचा परीघ तळाशी उंचीच्या १/६ असावा आणि टोकाशी १/४ असावा आणि खांबाचा १/३ भाग जमिनीमध्ये पुरला जावा.


कौटिल्य अर्थशास्त्राप्रमाणे किल्ल्याची संरक्षण व्यवस्था अधोच्छंद

कौटिल्य असेही म्हणतो कि वाद्याचे जेवढे क्षेत्र असेल त्याचे पाच भाग करावेत. त्यामध्ये विहिर बांधावी, तिच्या दोन्ही बाजूला दीर्घ चौरसाकार असे दोन सोपे बांधावेत आणि त्या दोन्ही सोप्यांच्या टोकास एकेक मोठी कोठी बांधावी. प्रत्येक सोप्याच्या बाहेरील बाजूस घुमटयुक्त असे दोन दोन उंच ओटे बांधावेत. त्या ओट्यांंच्या दरम्यान जाण्यायेण्यासाठी लहानसा दरवाजा ठेवावा. वरच्या बाजूला दुसरा मजला करावा. त्याची उंची ही तळमजल्याच्या अर्ध्याने असावी आणि त्याचे खांब फार जाड असू नयेत असे चाणक्य आपल्या अर्थशास्त्रामध्ये वर्णन करतो.

वेशीच्या दरवाजाचे वरचे लाकूड हे दोन हात जाड असावे. दरवाज्याचे बाजूचे उभे स्तंभ ३/५ हात जाडीचे असावे. दरवाजा बंद करण्यासाठी दोन मोठे अडसर असावेत. तसेच दरवाजाचे कुसु मुंढा हात लांबीचे असावेत. दरवाज्याला असणारी मधली दांडी ही पाच हात उंच असणे गरजेचे आहे तसेच हत्तीला शिरण्यास प्रतिबंध करणारे असे चार अडसर असावेत. गोपुराच्या जवळ अर्ध्या रुंदीइतका आणि दरवाज्याच्या उंचीइतका मातीचा बुरुज असावा.

मृदुंगाप्रमाणे किंवा मर्कटाच्या म्हणजेच माकडाच्या डोक्याच्या आकारासारखे दगडाचे कठडे बांधावेत किंवा मोठमोठ्या दगडांनी रचलेली दगडी भिंत बांधून घ्यावी असे कौटिल्य सांगतो.

जेथे किल्याच्याभोवती पाणी नसेल ती वाट जमिनीच्या आतून असावी. संपूर्ण तटाला शोभेल असा मुख्य वेशीचा दरवाजा बांधून त्याच्याशिवाय त्या दरवाज्याच्या १/३ एवढे सुसरीच्या तोंदासारखे द्वार ठेवलेले गोपुर बांधावे. तटाच्या आतमध्ये बावडी बांधावी आणि त्याच्यात उतरण्यासाठी पुष्करणीद्वार बांधावे. वेशीच्या दिंडीच्या दीडपट आकाराचे दरवाजे असलेले चार सोपे असलेले कुमारीपूर बांधावे. ते दोनमजली असावे त्याचा दरवाजा कमानीच्या आकाराचा असावा परंतु त्याला शिखर किंवा गोपुर नसावे. किल्ल्यामध्ये लागणारे महत्वाचे सामान आणि शस्त्रास्त्रे ठेवण्याकरिता गुप्त तळघरे असणे अत्यंत महत्वाचे आहे. त्या तळघरामध्ये गोटे, कुदळी, कुऱ्हाडी, बाण, गजदिकांचे शृंगार, गदा, मुद्गल, दंड, चक्रे, यंत्रे, शेकडो लोकांचा घाट करणारी शतघ्नी नावाची यंत्रे, लोहारांनी बनविलेली हत्यारे, त्रिशूळ, भाले, उंटाच्या मानेसारख्या वाकड्या बांबूच्या काठ्या, आगीचे बाण इत्यादी गोष्टींचा संग्रह करणे फार महत्वाचे आहे.

कौटिल्य अर्थशास्त्रामधील दुर्गाच्या आतील नगराची रचना:-

तट बांधून किल्ला बांधल्यानंतर आत जी जागा आहे त्यामध्ये पूर्व आणि पश्चिम असे तीन दक्षिणोत्तर तीन असे एकूण सहा रस्ते बांधावेत आणि नगरचे एकूण सहा भाग तयार करावेत. या संपूर्ण नगराला १२ दरवाजे असावेत. यामधील काही दरवाजांजवळ जमिनीवरून जाता यावे आणि काहींच्याजवळ पाण्यातून आणी काहींच्याजवळ भुयारातून जाता अयावे असे ते दरवाजे बांधणे गरजेचे आहे. गावातील रस्ते हे चार दंड रुंदीचे असावेत. त्याचप्रमाणे मुख्य राजमार्ग, द्रोणमुख, ठाणे, जनपद, गायराने, उतारपेठा, छावणी, आणि स्मशान यांच्याकडे जे रस्ते जातील ते आठ दंड रुंदीचे असावेत. तसेच धरणाकडे आणि वनात जाणारे रस्ते हे चार दंड रुंदीचे असावेत. हत्तीच्या रानात जाणारा रस्ता हा दोन दंड रुंदीचा असावा तर गाडी रस्ता हा ५ अरत्नी म्हणजे ५ मुंढा हात असावा तर गुरांचा रस्ता ४ अरत्नी आणि शेळ्या-मेंढ्या जाण्याचा रस्ता हा २ अरत्नी असावा असे कौटिल्य वर्णन करतो.
वरील रचना समजण्यास मदत होण्यासाठी पन्हाळागडाचा अधोच्छ्ंंद. 

शहराच्या मध्यापासून उत्तर दिशेला नवव्या भागामध्ये बळकट जागी राजवाडा बांधावा. त्याच्या आसपास चारही वर्णाची वस्ती असावी. राजवाडा उत्तराभिमुख किंवा पूर्वाभिमुख असावा आणि राजवाड्याची रचना 'निशान्तप्रणिधी' या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे असावी. राजवाड्याच्या ईशान्य दिशेला आचार्य, पुरोहित यांची राहण्याची जागा आणी यज्ञ करण्याची जागा तसेच जलागार, आणि मंत्र्यांची राहण्याची जागा असावी. राजवाड्याच्या आग्नेय दिशेला पाकशाळा, हत्तीशाळा, आणि कोठी असावी. तसेच पूर्व दिशेला गंध माला, धान्य, रस यांचे व्यापारी आणि प्रमुख कारागीर आणि क्षत्रिय यांची वस्ती असावी. राजवाड्याच्या दक्षिणेला  खजिना, सराफांचा बाजार, आणि इतर कारखाने असावेत. नैऋत्य भागात वनातून मिळणाऱ्या वस्तू आणि शस्त्रास्त्रे यांचे कोठार असावे. वाड्याच्या दक्षिण दिशेला नगराध्यक्ष, धान्याध्यक्ष, व्यापाराध्यक्ष, आणि कारखान्याचा अध्यक्ष आणी सेनाध्यक्ष यांची निवासस्थाने असावीत. तसेच पक्वान्ने, मद्य, मांस, वेश्या, नट, छोटे व्यापारी यांचीही निवासस्थाने असावीत.

वाड्याच्या नैऋत्येला गाढवे आणि उंट यांचे गोठे असावेत तसेच त्यांची काम करण्याची जागा असावी. वायव्य भागामध्ये रथ वगैरे वाहने ठेवण्याची जागा असावी. त्याच्या पलीकडच्या बाजूस लोकर आणि कापसाची वस्त्रे बनविणाऱ्या लोकांची जागा असावी, बुरुड, चामडे कमावणारे, चिलखते, शस्त्रे, म्यान वगैरेंची निवासस्थाने असावीत. नैऋत्य दिशेला दुकाने, औषधे तयार करण्याची शाळा असावी, ईशान्य भागामध्ये कोठार, गोशाळा, आणि घोड्यांची पागा असावी. त्याच्या पलीकडच्या बाजूला देवालये, लोहार, जवाहिरे, आणि ब्राम्हण यांचे निवासस्थान असावे. मध्यभागामध्ये जेथे जागा सापडेल तेथे स्थानिक व्यापारी आणि परदेशी व्यापारी यांचे जे संघ आहेत त्या संघाची जागा असावी.

कौटिल्याने  वर्णिलेल्या  दुर्गाप्रमाणे डोंगरी संरक्षण दुर्गाचे चांगले उदाहरण म्हणजे 'देवगिरीचा किल्ला' 

शहराच्या मध्यभागी अपराजिता म्हणजेच लक्ष्मी, अप्रतिहत म्हणजे विष्णू, जयंत म्हणजे कार्तिकस्वामी, वैजयंत म्हणजे इंद्र, शिव, कुबेर, अश्विनीकुमार, चामुंडा या देवतांची देवालये बांधून घ्यावीत. देवालयाच्या दरवाज्यावर ब्रम्हा, इंद्र, यम, आणि कार्तिकस्वामी यांची स्थापना करावी. किल्ल्याच्याभोवती जो खंदक आहे त्याच्याबाहेर चाशे हातांच्यापलीकडे चैत्यवृक्षाचे पार, मठ, तीर्थे, सेतू, बांधून घ्यावेत. दाही दिशांना त्या त्या स्वामी असलेल्या देवतांची स्थापना करावी गावाच्या पूर्वेला आणि उत्तरेला स्मशान असावे. दक्षिण दिशेला श्रेष्ठवर्णाच्या लोकांचे स्मशान असावे. हे सर्व वर्णन कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये वर्णन करतो.

पुढे कौटिल्य असेही म्हणतो कि राजाने नेहमी आपल्या कोथारामध्ये तेल, तूप, धान्य, सैंधव-मीठ, औषधे, वाळलेल्या भाज्या, सातू, वाळलेले मांस, गवत, लाकडे, धातू, कातडी, कोळसा, तात, विषे, शिंगे, वेळू, वल्कलांना लागणाऱ्या साली, इमारतीची लाकडे, हल्ला करायची संरक्षक हत्यारे, तसेच शस्त्रे, गोटे यांचा अनेक वर्षे पुरेल इतका साठा करून ठेवला पाहिजे, जेव्हा नवीन संग्रह हाती येईल तेव्हा जुना संग्रह काढून टाकणे गरजेचे आहे. किल्ल्यामध्ये हत्ती, घोडे, रथ, पायदळ, यांच्यावर निरनिराळे अधिकारी नेमून त्यांची किल्ल्यात नेमणूक करावी. अनेक अधिकारी नेमले म्हणजे एकमेकांच्या भयाने शत्रूला फितूर होत नाही. याचप्रमाणे सीमेवर जे किल्ले आहेत त्यांचीही व्यवस्था ठेवावी. किल्ल्यामध्ये शहर आणि राज्य यांचे घात करणारे मठ किंवा विहार हे स्थापन करण्याची परवानगी देऊ नये. अशा मठांना किंवा विहारांना जनपदात जागा नेमून द्यावी आणि त्या सर्वांकडून योग्य कर घ्यावा.


देवगिरीच्या किल्ल्याचे प्रवेशद्वाराची रचना.

मौर्यकालीन पाटलीपुत्र:-

मौर्य सम्राट 'चंद्रगुप्त मौर्य' याच्या कालखंडात त्याच्या दरबारात पाश्चात्यांचा बराच राबता होता असे दिसते इ.स.पू. ३०३ मध्ये 'सेल्युकस निकेटर' याच्याशी झालेल्या तहामुळे जे सेल्युकस निकेटर याची मुलगी आणि 'चंद्रगुप्त मौर्य' यांच्या विवाहसंबंधातून मित्रत्वाचे नाते निर्माण झाले त्या कालखंडात 'मेगॅॅस्थिनीस' हा ग्रीक राजदूत जेव्हा 'पाटलीपुत्र' येथे आला तेव्हा त्याने 'पाटलीपुत्र' शहराचे वर्णन केलेले उपलब्ध आहे तो म्हणतो "गंगा नदीच्या तीरावर वसलेले पाटलीपुत्र म्हणजे खरोखरची एक भव्य नगरी आहे. नऊ मैल लांब आणि दीड मैल रुंदी असा तिचा विस्तार होता. शहराच्या सभोवती एक लाकडी तट बांधलेला असून त्याला ६४ वेशी होत्या आणि ५७० बुरुज होते. तटाच्या भोवताली खोल खंदक होता त्यामुळे बाहेरच्यांना आत जाण्यास प्रतिबंध होत असे. घरे दुमजली आणि तीनमजली होती. ती लाकडाची असल्याने आगीपासून त्यांचे खास संरक्षण करण्याच्या दृष्टीने खास पद्धत काळजीपूर्वक आखण्यात आळी होती. शहराच्या मध्यभागी भव्य राजवाडा असून त्याच्या सभोवती रमणीय परंतु बंदिस्त बगीचा आहे. त्यात माश्यांचे तलाव होते. हा संपूर्ण राजवाडा लाकडाचा असून रत्नखचित सुवर्णाने मढविलेला होता."

 'कुमराहार' येथे जेव्हा उत्खनन केले तेव्हा त्यांना 'चंद्रगुप्त मौर्य' याच्या राजवाड्याचे अवशेष मिळाले.
(छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.)

आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांनी १९१२-१३ मध्ये यांनी 'पाटलीपुत्र' म्हणजेच 'पटना' येथून ५ कि.मी. अंतरावर असलेले 'कुमराहार' येथे जेव्हा उत्खनन केले तेव्हा त्यांना 'चंद्रगुप्त मौर्य' याच्या राजवाड्याचे अवशेष मिळाले तसेच 'कुमराहार' पटना येथे जेव्हा उत्खनन केले गेले तेव्हा मौर्य कालीन लाकडी तटबंदी आणि खंदक यांचे अवशेष मिळालेले आहे त्याच्यावरून प्राचीन काळातील 'पाटलीपुत्र' कसे होते आणि कौटिल्याने केलेले नगररचना आणि दुर्ग वर्णन जुळते हे आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांनी १९५१-१९५५ या कालावधी मध्ये जो रिपोर्ट केला याच्यावर त्यामध्ये याचे सविस्तर वर्णन आहे.

'कुमराहार' पटना येथे जेव्हा उत्खनन केले गेले तेव्हा मौर्य कालीन लाकडी तटबंदी आणि खंदक यांचे अवशेष मिळाले.
(छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.)

अभिलाषतीर्थ चिंतामणी:-

११ व्या शतकाच्या अखेरीस सोमेश्वर देव याने या ग्रंथाची निर्मिती केली यामध्ये त्याने किल्ल्यांचे ९ प्रकार सांगितलेले आपल्याला दिसतात ते पुढीलप्रमाणे:-

१. निसर्गसिद्ध जलाने वेष्टित तो जलदुर्ग.
२. अवघड चढाच्या आणि पाण्याच्या सोयीने समृद्ध अशा उंच शिखरावरील गिरीदुर्ग.
३. पाषाणात भक्कम बांधून काढलेला तो अश्मदुर्ग.
४. विटा, चुना यांनी बांधलेला आणि खंदकाने वेष्टित असलेला तो इष्टीकादुर्ग.
५. चिखलमातीतच बांधून काढलेला तो मृत्तिकादुर्ग.
६. दाट काटेरी झाडांच्या किंवा करवंदी वगैरे सारख्या कुंपणाने संरक्षित तो वार्क्ष्य किंवा वनदुर्ग.
७. ओसाड आणि जलहीन प्रदेशात मध्येच पाण्याच्या आश्रयाने बांधलेला तो मरूदुर्ग.
८. वेळू किंवा लाकडाचा कूड किंवा भिंती यांचा सभोवार तट असलेला तो दारूदुर्ग.
९. शस्त्रांस्त्रासहित शूर योद्ध्यांनी रक्षण केला जात आहे तो नृदुर्ग किंवा नरदुर्ग.

समरांगणसूत्रधार:-

समरांगणसूत्रधार हा ग्रंथ भारतीय वास्तूशास्त्राशी संबंधित असून याची निर्मिती परमार राजा भोज याने इ.स. १००० -१०५५ याने केलेली आहे. या ग्रंथामध्ये तसे पहायला गेले तर सामान्य जनतेच्या घरांची योजना, आखणी आणि नगर उभारणी याबाबतची माहिती मिळते. तसेच या ग्रंथामध्ये अग्निशाळा, गोशाळा, गजशाळा, पाठशाळा यांचाही विचार केलेला आपल्याला पहायला मिळतो. यामध्ये आपल्याला विमान, प्रासाद, अशा बहुमजली इमारती राजकुटुंब आणि तोलदार मानकरी यांच्यासाठी असाव्यात. किल्ल्यांमध्ये इमारती उभारताना सुरक्षितता आणि संरक्षणाला अग्रक्रम दिला जावा असे या ग्रंथामध्ये म्हटले आहे. पाच तऱ्हेच्या इमारती किल्ल्यांमध्ये असाव्यात असे वर्णन यामध्ये केलेले आपल्याला आढळते.यामध्ये भोज राजाने ६ प्रकारचे दुर्ग दिलेले आहेत.


कौटिल्य अर्थशास्त्र यामध्ये सांगितलेली अश्वशाळेची रचना.
मयमत:-

या ग्रंथामध्ये राजधानी असणाऱ्या नगरकोटाची रचना कशी असावी यामधल्या वास्तू कश्या असाव्यात याबदल माहिती दिलेली आहे.

अश्या प्रकारे दुर्ग किंवा किल्ल्यांबद्दल प्राचीन उल्लेख हे आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथांंमधून आढळून येतात यावरून किल्ल्यांचे महत्व हे प्राचीन काळापासून किती आहे हे देखील आपल्याला समजून येते. या प्रत्येक कालखंडात विविध किल्ले उभारले गेले त्यांची रचना कशी होती याबद्दलची ही माहिती आपल्याला या ग्रंथांवरून समजायला मदत होते आणि प्राचीन काळातील किल्ले किती महत्वाचे होते किंवा त्यांचे स्वरूप काय होते हे या प्राचीन उल्लेखांमधून आपल्याला समजते.


घोडे जेथे बांधावयाचे तेथील व्यवस्था कशी असावी तर प्रत्येक घोड्यासाठी स्वतंत्र घोड्याच्या लांबीच्या प्रमाणात चौरस अशी व गुळगुळीत फळ्यांंची तक्तपोशी केलेली असावी.
________________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) महाराष्ट्रातील पुरातत्व:- ह.धी.सांकलिया आणि म.श्री.माटे., महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक महामंडळ.
२) भारताची कुळकथा:- डॉ.म.के.ढवळीकर, राजहंस प्रकाशन.
३) दुर्ग:- सतीश अक्कलकोट.
४) शिवकालातील दुर्ग व दुर्गव्यवस्था:- महेश तेंडूलकर, स्नेहल प्रकाशन.
५) मध्ययुगीन कालखंड (राजकीय व सामाजिक इतिहास):- महाराष्ट्र राज्य गॅझेटीअर.
६) सह्याद्री:- स.आ. जोगळेकर. शुभदा सारस्वत प्रकाशन.
७) कौटिल्य अर्थशास्त्रातील शिल्पशास्त्र:- डॉ.र.पू.कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक महामंडळ.
८) मनुस्मृती:- डॉ.अिंंन्दु भूषण बडे., मनोरमा प्रकाशन.
९) शुक्रनिती:- खेमराज श्रीकृष्णदासने (१९५२).
१०) Rigveda (The Oldest Divine Book):- R.T.H.Griffith & F. Max Muller., Sacred Books of The East.         
११) समरांगण सूत्रधार:- वास्तू वाड्मय प्रकाशन शाला, १९६५
१२) अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास:- रोमिला थापर, अनुवाद डॉ. शरावती शिरगावकर, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक महामंडळ.
१३) Report On Kumrahar Excavations:- Altekar A.S. and Vijayakanta Mishra, Archaeological Survey of India, 1951-1955. 
१४) गड-कोट-दुर्ग आणि त्यांची वास्तू:- वा.सी.बेंद्रे, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या इतिहास संशोधन मंडळाची ग्रंथमाला, क्रमांक ५, १९६५.
   
_________________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात. 

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

नऊ छायाचित्र आंतरजालावरून घेतली आहेत. आठ छायाचित्र ही समजण्यासाठी पी.डी.एफ. पुस्तकातील आहेत 
लिखाण आणि सात छायाचित्र © २०१८ महाराष्ट्राची शोधयात्रा
 



       



 





          

                              
     
             
     
   

1 comment:

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage