दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगडावरील शिलालेख'


पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीनही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला एक पुराणपुरुष असलेला पर्वत म्हणजे 'हरिश्चंद्रगड'. भटक्यांची पंढरी असलेल्या या 'हरिश्चंद्रगडाला' विशेष महत्व लाभले आहे ते त्याच्या नैसर्गिक 'कोकणकड्यामुळे'. 'हरिश्चंद्रगड' येथे जाण्यायेण्याच्या वाटा गिर्यारोहकांना आता अगदी माहिती आहेत. खिरेश्वर, पाचनई या वाटांवरून सतत गिर्यारोहक येत असतात तसेच 'नळीची वाट' आता हि फारच प्रसिद्ध वाट झालेली आहे. यापैकी 'नळीच्या वाटेवरून' वरती येतो तेव्हा आपण 'कोकणकड्याजवळ' येतो. तसेच 'पाचनई'  आणि 'खिरेश्वर' मार्गे आपण 'हरिश्चंद्रगडावर' असणाऱ्या 'हरीश्चंद्रेश्वर' मंदिराच्या इथे आपण येऊन पोहोचतो. मुळात सगळे भटके 'हरिश्चंद्रगड' येथे येतात ते केवळ 'कोकणकडा' बघायला आणि 'इंद्रवज्र' बघायला. परंतु पौराणिक आख्यायिकेंसोबत 'हरिश्चंद्रगड' येथे असलेल्या 'लेण्या' आणि 'मंदिरे' देखील फार महत्वाच्या गोष्टी आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे दुर्गभटक्यांची पंढरी असलेल्या 'हरिश्चंद्रगड' येथे तब्बल 'आठ शिलालेख' आहेत.

दुर्गभटक्यांची पंढरी असलेल्या 'हरिश्चंद्रगड' येथे ८ ते ९ लेण्या आहेत. 'हरिश्चंद्रगड' येथील लेण्या या 'हरिश्चंद्रगडाच्या बालेकिल्ल्यापासून' जवळपास ६०० फुट खाली आहेत. या लेण्या ओबडधोबड असून आतमध्ये जास्त शिल्पकाम आपल्याला आढळून येत नाही. काही लेण्यांच्या दारांंवर आपल्याला 'गणेशपट्टी' आढळून येते. तसेच या लेण्या या आतून देखील फार मोठ्या नाहीत तसेच या लेण्यांच्या आतील खांब देखील हे फारसे सुबक नाहीत आणि त्याच्यावर जास्त कोरीवकाम आपल्याला आजिबात दिसत नाही. गिर्यारोहक या लेण्यांचा वापर राहण्यासाठी करतात. या लेण्या जर नीट पाहिल्या तर आपल्याला त्यांच्या आतमध्ये मोठमोठे ओबडधोबड तासलेले चौकोनी खांब पाहायला मिळतात तसेच भिंतींच्या जवळ आपल्याला ओटे देखील पाहायला मिळतात. याच लेण्यांच्या अगदी खालच्या बाजूला आहे ती 'हरिश्चंद्रगडावर' असलेली 'पुष्करणी' या प्रसिद्ध 'पुष्करणीच्या' दक्षिणेला काही देवळ्या आहेत ज्याच्यामध्ये बसून आत्ता सध्या लोकं फोटो काढतात. या देवळ्यांंमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. हि पुष्करणी 'हेमाडपंथी' पद्धतीची आहे हे तिच्या स्थापत्यशैलीवरून समजते. याच 'पुष्करणीच्या' आजूबाजूला आपल्याला लहान लहान मंदिरे पाहायला मिळतात तसेच या मंदिरांच्या आजूबाजूला 'किर्तीमुखे' देखील ठेवलेली दिसतात.

'हरिश्चंद्रगडाला' विशेष महत्व लाभले आहे ते त्याच्या नैसर्गिक 'कोकणकड्यामुळे'.

या पुष्करणीच्या जवळून आपण पुढे आलो की आपल्याला दिसते ते 'हरिश्चंद्रगड' येथील 'हरिश्चंद्रेश्वर' मंदिर. याची रचना देखील हेमाडपंथी पद्धतीमध्ये आहे. 'हरिश्चंद्रेश्वराचे' मंदिराचा काही भाग हा 'हरिश्चंद्रगडाच्या' पाषाणातून कोरून काढलेला आपल्याला पाहायला मिळतो तर या मंदिराचा काही भाग हा दगडांनी बांधून काढलेला आहे. 'हरिश्चंद्रेश्वराचे' मंदिर जर आपण नीट पाहिले तर या मंदिराला आपल्याला कुठेही सभामंडप दिसून येत नाही. 'हरिश्चंद्रेश्वर' मंदिराला चारही बाजूने आपल्याला दरवाजे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. याच 'हरिश्चंद्रेश्वर' मंदिराच्या गर्भगृहामध्ये शिवलिंगाची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच जर आपण 'हरिश्चंद्रगड' नीट पाहिला तर संपूर्ण गडावर आपल्याला मोठ्या प्रमाणात 'शिवलिंग आणि शाळुंका' या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात याच्यावरून हे नक्की समजते कि 'हरिश्चंद्रगड' हे 'शैवउपासकांचे' स्थान होते हे समजते.

'हरिश्चंद्रेश्वर' मंदिराच्या आवारात आपल्याला गुहा पाहायला मिळतात काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत. या गुहा बहुतेक करून तरी 'योग्यांसाठी' राहायला बनवलेल्या असाव्यात. 'हरिश्चंद्रेश्वर' मंदिराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा 'तारामती' शिखरावरून खाली वाहत येतो यालाच 'मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. येथून पुढे आपण जेव्हा मंगळगंगा नदीच्या प्रवाहाच्या दिशेने जेव्हा चालत जातो तेव्हा तेथून पुढे आपल्याला डाव्या हाताला एक लेणे बघायला मिळते. हे लेणे 'केदारेश्वर' गुहा ओळखले जाते. 'केदारेश्वर' लेण्याची रुंदी हि जवळपास सहाशे फुट आहे. 'केदारेश्वर' लेणे हे आतमध्ये जवळपास पाच फुट खोल खोदलेले आहे म्हणून या  लेणीमध्ये वर्षभर पाणी भरलेले असते. पूर्वी या 'केदारेश्वर' लेणीमध्ये चार खांब होते सध्या ह्या लेणीमध्ये एकच खांब शिल्लक राहिलेला आहे.

पुष्करणी 'हेमाडपंथी' पद्धतीची आहे हे तिच्या स्थापत्यशैलीवरून समजते. 

'केदारेश्वर' लेण्यामध्ये खांबाच्या मध्ये जवळपास ३ फुट उंच आणि ६ फुट रुंद असलेले 'शिवलिंग' आपल्याला पाहायला मिळते. याच शिवलिंगाला 'केदारेश्वराचे शिवलिंग' म्हणून ओळखतात. याच लेण्यामध्ये एक खोली देखील आहे. या खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आपल्याला बघायला मिळतो. या 'केदारेश्वर शिवलिंगाला' प्रदक्षिणा घालावयाची असल्यास आपल्याला थंड पाण्यातून जावे लागते. हे लेणे मुळातच खोलवर खोदले  असल्यामुळे या लेण्यामध्ये वर्षभर पाणी साठलेले असते. 'गॅॅझेटीयर ऑफ दि बॉम्बे प्रेसिडेन्सी व्हॉल्युम १७ अहमदनगर' मध्ये पृष्ठ क्रमांक ७१९ मध्ये या लेण्यातील खांबांची तुलना आपल्याला घारापुरी लेण्यांमधील खांबांशी केलेली मिळते.

'हरिश्चंद्रगड' येथील लेण्यांमध्ये काही शिलालेख आहेत याबाबत इंडियन अँँटीक्वेरी वर्ष ५ वे १८७७ पान क्रमांक ११ या ग्रंथात डब्ल्यू.एफ सिंक्लेअर यांनी 'नोट्स ऑन दि अहमदनगर कलेक्टोरेट' या लेण्यांचे वर्णन करताना लिहिलेले आहे ते पुढीलप्रमाणे:-

"The pit is enclosed on the approachable side by a massive stone wall, outside of which and the pillars of the dharmashala and linga caves are two or three very rude and fragmentary inscriptions, apparently in rather modern Marathi characters; but I had not time to stamp or read them, nor could I get a copy of taken. I fancy they are merely the work of visitors or idlers."

'हरिश्चंद्रगड' याच्यावर असणाऱ्या शिलालेखांच्या बाबत हे उल्लेख फार महत्वाचे ठरतात. याच्यानंतर 'हरिश्चंद्रगड' येथील लेण्यांच्या शिलालेखाबाबत उल्लेख हा 'जेम्स फर्ग्युसन' आणि 'जेम्स बर्जेस' यांनी आपल्या 'केव्ह टेंपल्स ऑफ इंडिया' या पुस्तकात पान क्रमांक ४७८ वर केलेला आहे. तो उल्लेख पुढीलप्रमाणे:-

"But the style of the low doorways, and of the pillars in the second cave from the east end of the range the detached sculptures lying about and some fragments of inscriptions, all seem to point to about the tenth or eleventh century."

तसेच 'गॅॅझेटीयर ऑफ दि बॉम्बे प्रेसिडेन्सी व्हॉल्युम १७ अहमदनगर' यामध्ये पान क्रमांक ७१९ मध्ये जो उल्लेख आलेला आहे तो पुढीलप्रमाणे:-

"The style of low doorways and of the pillars in Cave II., Some detached sculptures lying about the us of Ganpati on the lintels. and some fragments of inscriptions seem to point to about the tenth or the eleventh century as the date of the caves."


याच शिवलिंगाला 'केदारेश्वराचे शिवलिंग' म्हणून ओळखतात.

यानंतर मधल्या कालखंडात आपल्याला 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेखांच्याबद्दल माहिती कुठेही आढळून येत नाही त्याच्यानंतर या 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेखांचा उल्लेख आपल्याला थेट आढळतो तो प्रसिद्ध लेखक आणि दुर्गभटक्यांचे लाडके व्यक्तिमत्व गो.नि. दांडेकर यांच्या १९६९ साली प्रकाशित झालेल्या 'दुर्गदर्शन' या पुस्तकात 'हरिश्चंद्र दुर्ग' या प्रवासवर्णन केलेल्या लेखामध्ये पान क्रमांक १५६ आणि १५७ तर आज जी नवीन आवृत्ती बाजारात आहे त्यामध्ये २०००, २००४, २०१२ या तीन आवृत्या या मृण्मयी प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या असून त्यामधील 'हरिश्चंद्र दुर्ग' प्रकरण ११ यामधील पान क्रमांक १७० आणि १७१ यामध्ये आपल्या प्रवासवर्णनामध्ये गो.नि.दांडेकर यांनी उल्लेख केला आहे त्यामध्ये त्यांनी 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख वाचायचा देखील प्रयत्न केला आहे असे दिसून येते. गो. नि. दांडेकर यांच्या 'हरिश्चंद्रगड' येथील प्रवासवर्णनाचा उतारा पुढीलप्रमाणे:-

"मुख्य मंदीराचंं बांधकाम दुर्लक्ष-उपेक्षेमुळे ढासळूंं लागले आहे, तरी तेंं मुळांंत इतकं मजबूत, कींं आणखी दीडदोनशेंं वर्षं हे देऊळ मान टाकणार नाही. बाळाची नजर मोठी चौकस. तो बाहेरून म्हणाला, "आप्पा, इथं शिलालेख आहेत. एकच नव्हे, सहा!" पाहिलं तर खरचं! मंदिराभंवतालींच्या प्रवेशद्वारातून आत शिरण्यापूर्वी दोन्ही बाजवांच्या भिंतींवर शिलालेख कोरलेले. पैकी डावे हाताचे भिंतीवरच्या शिलालेखांतील वरील ओळीचा निम्मा भाग तर सहज वाचता आला -

चक्रपाणिवटेश्वर: नन्दतुतस्य सुत:....

चक्रपाणी वटेश्वर? अरे हा तर वटेश्वर चांगदेव! ज्ञानोबांनी चांगदेवपासष्टीतंं शेवटी म्हटलं आहे-

एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे| दोन्ही डोळस आरिसे |
परस्पर पाहातांं कैसे| मुकले भेदा||
                              
पण त्या वटेश्वर चक्रपाणीचा इथे कायं संबंध? त्याचा पुत्र कोण? छे छे! कोडं अधिकाधिक गुंतत चाललं आहे! नव्हे, या लेखांचे ठसे घेतलेच पाहिजेत, पुढल्या वेळी.

केदारेश्वर लेणीमधील खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आपल्याला बघायला मिळतो.

हे महत्वाचे वर्णन आपल्याला 'दुर्गदर्शन' या 'गो. नि. दांडेकर' यांच्या पुस्तकात वाचायला मिळते. यानंतर मात्र हे हरिश्चंद्रगड येथील शिलालेख वाचायचा कोणी प्रयत्न केलेला दिसत नाही. 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख हे नागपूर विद्यापीठ येथील संशोधक 'प्रा. म. रा जोशी' हे जेव्हा 'हरिश्चंद्रगड' येथे गेले होते तेव्हा त्यांच्या दृष्टीस गडावरील शिलालेख दृष्टीस पडल्यावर त्यांनी 'डॉ. वि. भि. कोलते' आणि महाराष्ट्र राज्याचे पुरातत्व विभागाचे संचालक 'वि. गो. खोबरेकर' यांना सांगितली. या माहितीनंतर 'वि. गो. खोबरेकर' यांनी पुरातत्व विभागाचे लोकं 'हरिश्चंद्रगड' येथे पाठवून त्या शिलालेखांचे ठसे घेतले आणि 'डॉ. वि. भि. कोलते' यांच्या विनंतीनुसार 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेखांचे वाचन 'डॉ. वि. भि. कोलते' यांनी या शिलालेखांचे वाचन केले.

'हरिश्चंद्रगड' येथील पाहिला शिलालेख हा 'हरीशचंद्रेश्वर' मंदिराच्याभोवती प्राकाराच्या प्रवेशद्वारातून आत जाण्यापूर्वी डाव्या हाताच्या भिंतीवर कोरलेला आपल्याला पाहायला मिळतो. या शिलालेखाची लांबी हि १६० सें.मी. ५ फुट ४ इंच असून याची अक्षरे खूप मोठी आणि ठसठशीत असून प्रत्येक अक्षराची उंची १० ते ११ सें.मी असून रुंदी ७ ते ८ सें.मी आहे. या शिलालेखातील अक्षरे देवनागरी लिपीमध्ये कोरलेली आहेत. या अक्षरवाटिकेप्रमाणे हा लेख साधारणपणेतेराव्या शतकात कोरला असावा असे 'डॉ. वि. भि. कोलते' यांना वाटते. शिलालेखाचे वाचन पुढीलप्रमाणे:-

चक्रपाणी वटेस्वर नंदनु तस्य सुतु वीकटदेओ

हा पहिला शिलालेख जर आपण पाहिला तर यामध्ये असे दिसून येते की 'चक्रपाणी वटेश्वर' हा महत्वाचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. गो. नि. दांडेकर यांनी जो 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख वाचला त्यामध्ये त्यांनी 'चक्रपाणिवटेश्वर: नन्दतुतस्य सुत:....' अशी अक्षरे वाचली आहेत परंतु 'डॉ. वि. भि. कोलते' यांनी शिलालेखावरून जी अक्षरे वाचली आहेत त्यामध्ये 'वटेश्वर:' असा शब्द नसून 'वटेस्वर' असा शब्द आहे. दगड तिथे फुटल्यामुळे दोन पांढरे ठिपके दिसतात तसेच 'डॉ. वि. भि. कोलते' यांना 'श्व' च्या जागी 'स्व' हे अक्षर ठ्श्यामध्ये स्पष्ट आढळून आले आहे. तसेच 'गो. नि. दांडेकर' यांनी वाचलेल्या 'नन्दतु' हा शब्द 'डॉ. वि. भि. कोलते' यांच्या ठश्यामध्ये 'नंदनु' असा व्यवस्थित दिसतो. तसेच 'सुत:' हा शब्द देखील ठश्यामध्ये 'सुतु' असा स्पष्ट दिसतो. 

अर्थात 'गो. नि. दांडेकर' यांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे की "या लेखांचे ठसे घेतलेच पाहिजेत, पुढल्या वेळी." त्याचदरम्यान हे ठसे घेऊन त्यांचे वाचन करण्याचे काम 'डॉ. वि. भि. कोलते' यांनी केलेले आपल्याला पाहायला मिळते. तसेच वरील शिलालेख हा 'गो. नि. दांडेकर' यांनी नुसत्या डोळ्यांना जेवढी अक्षरे दिसतील तसा वाचला होता हे आपल्याला समजते. तर 'डॉ. वि. भि. कोलते' यांना पुरातत्व खात्याच्या माणसांनी 'हरीशचंद्रगड' येथे जाऊन ठसे घेऊन वाचायला दिला होता त्यामुळे 'डॉ. वि. भि. कोलते' यांच्याकडून हे महत्वाचे काम झाले हे आपल्याला पाहायला मिळते. तसेच 'हरिश्चंद्रगड' येथील मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या बाजूला देखील एक शिलालेख आहे असे गो.नि.दांडेकर यांनी म्हटले आहे परंतु जे शिलालेखांचे ठसे 'डॉ. वि. भि. कोलते' यांना मिळालेले आहेत त्यामध्ये हा शिलालेख कोणता हे त्यांना निश्चितपणे सांगता मात्र आलेला नाही. 

'हरिश्चंद्रगड' येथील दुसरा शिलालेख हा 'केदारेश्वर' लेण्याच्या दर्शनी स्तंभावर कोरलेला आहे असे स्पष्ट 'डॉ. वि. भि. कोलते' सांगतात. परंतु सध्या या लेण्यामध्ये एकच खांब शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे या लेखाचे महत्व अजून आपल्या दृष्टीने वाढते. या सध्या पडून गेलेल्या खांबावरील लेखाची लांबी हि जवळजवळ ५० सें.मी. आहे. या शिलालेखाचे अक्षरांचे वळण हे प्राचीन असल्यासारखे 'डॉ. वि. भि. कोलते' ह्यांना वाटत होते. त्यांचा कयास असाही होता की हि लिपी 'ब्राम्ही' असावी. परंतु ह्या शिलालेखाची अक्षरवाटिका हि प्राचीन देवनागरी लिपीचे स्वरूप दाखवते. ह्या शिलालेखाचे वाचन करण्यासाठी 'डॉ. वि. भि. कोलते' यांना 'महामहोपाध्याय वा. वि. मिराशी' यांनी केली तसेच या लेखाचे वाचन देखील 'महामहोपाध्याय वा. वि. मिराशी' यांनीच 'डॉ. वि. भि. कोलते' यांना सुचविले.या 'केदारेश्वर' लेण्याच्या दर्शनी स्तंभावर कोरलेला शिलालेख पुढीलप्रमाणे:-

[सिद्धं] श्री गुहेश्वर भैरव 

या दर्शनी स्तंभावर कोरलेल्या शिलालेखामधील सुरुवातीची अक्षरे अस्पष्ट आहेत.'सिद्धं' किंवा सिद्ध हा शब्द तेथे असावा असे तेथे वाटते. तसेच या शिलालेखात 'श्री' हे अक्षर फार मोठे कोरले आहे हे ठश्यावरून समजायला मदत होते. तसेच 'गुहेश्वर' या शब्दामधील 'गु' हे वाक्य अक्षर देखील ठश्यावरून व्यवस्थित वाचता येते. तसेच मधल्या भागात एक आडवी रेघ मारलेली दिसते हि रेघ बहुदा दगड फुटल्यामुळे दिसत असावी हे ठश्यावरून समजते. या शिलालेखातील पुढचे अक्षर हे 'हे' असे असून याची मात्र हि ब्राम्ही लिपी मध्ये मात्रेप्रमाणे डावीकडे आडवी रेष कोरून दाखवलेली आहे. तसेच तिला खाली अजून एक उभी रेष देखील दाखवलेली आहे. या लेखामध्ये 'भैरव' या शब्दामधील 'भ' हे अक्षर ज्या पद्धतीमध्ये लिहिले आहे ते देखील पाहण्यासारखे आहे.

'केदारेश्वर' लेण्याच्या दर्शनी स्तंभावर कोरलेला दुसरा शिलालेख देखील दोन ओळींचा आहे. हा लेख देखील बराच मोठा असून याच्या अक्षरांची लांबी हि जवळपास ७० सें.मी. असून दुसऱ्या ओळीची लांबी देखील १७ सें.मी आहे. याची अक्षरे ठसठशीत असून हा सगळा शिलालेख देवनागरी लिपीमध्ये कोरलेला आहे. या अक्षरवाटिकेचे वळण देखील सुबक आहे. या शिलालेखात अक्षरांचे उभे उभे दंड हे खाली लांब कोरलेले दिसतात. तसेच टोकांना बाक दिले आहेत. शिलालेखातील वेलांटी देखील व्यवस्थित आहे. तसेच शिलालेखातील वरील रेषा देखील नक्षीदार ओढलेल्या आहेत. शिलालेखातील 'श्री' या अक्षरानंतर पाच अक्षरानंतर मोकळी जागा सोडलेली आढळते. 'डॉ. वि. भि. कोलते' यांच्या अंदाजाप्रमाणे तेथे शिवमूर्तीचा पाय असावा. तसेच सुरुवातीचा 'श्री' हा देखील नक्षीदार कोरलेला आहे. मोकळ्या जागी कोणती अक्षरे असतील हे काही ठश्यामध्ये दिसत नसल्याने सांगता येत नाही. तसेच पुढील अक्षरांचा अंदाज जर घेतला तर ती अक्षरे हि 'वटे' असावीत अशी कल्पना 'डॉ. वि. भि. कोलते' यांनी केली आहे. 'केदारेश्वर' लेण्याच्या दर्शनी स्तंभावर कोरलेला दुसरा शिलालेख पुढीलप्रमाणे:-

श्री[वटे]सर सिवस्य प्रण
[म]ति: |

'हरिश्चंद्रगड' येथे असलेल्या 'हरिश्चंद्रेश्वर' मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या लेण्यातील खांबावर चौथा शिलालेख आढळतो. या शिलालेखाच्या ठश्यावरून असे लक्षात येते की यातील सुरुवातीचे अक्षर गेलेले आहे. तसेच हा लेख देखील अपूर्ण आहे असे शिलालेखांच्या ठश्यांंवरून समजते. या शिलालेखाची लांबी हि जवळपास ५६ सें.मी. आहे. या शिलालेखातील अक्षरे हि मोठी असून ति नागरी लिपीमध्ये कोरलेली आहेत. या शिलालेखातील काही अक्षरांची उंची हि ८ सें.मी असून काही अक्षरांची उंची हि १३ ते १४ सें.मी आहे. या शिलालेखामध्ये सुरुवातीला असलेल्या आणि आता नष्ट झालेल्या अक्षरातला शेवटचा 'काना' मात्र घेतलेल्या ठश्यामध्ये व्यवस्थित दिसतो. याच्यापुढे 'डॉ. वि. भि. कोलते' यांना जे अक्षर ठश्यामध्ये दिसले आहे ते अक्षर 'गा' असे आहे. हे 'गा' अक्षर ठश्यामध्ये आजच्या 'णा' सारखे दिसते. या घेतलेल्या ठश्यामध्ये पुढील अक्षर हे 'वटेस्वराचा' असे आहे. हे जर अक्षर आपण लक्षात घेतले तर मागील शब्द जो आहे ज्याचा फक्त 'काना' दिसतो तो शब्द एकतर 'चक्रपाणी' किंवा 'चांगा' असावा असे 'डॉ. वि. भि. कोलते' यांना वाटते. या लेखाचे वाचन पुढीलप्रमाणे:-


[चां*]गा वटेस्वराचा

या शिलालेखांमुळे एक महत्वाची गोष्ट समजते ती म्हणजे 'हरिश्चंद्रेश्वर' मंदिराच्या आवरात जो शिलालेख आहे त्याच्यामध्ये 'चक्रपाणी वटेस्वर' असे नाव आले असून वरील शिलालेखामध्ये 'चांगा वटेस्वर' असे नाव आलेले आहे हि गोष्ट निश्चितचलक्षात घेण्यासारखी आहे. 

'हरिश्चंद्रगडावर' असलेल्या 'हरिश्चंद्रेश्वर' मंदिराच्या मागच्या बाजूला जे लेणे आहे त्या लेण्याच्या दर्शनी स्तंभावर समोरच्या बाजूला एक लेख कोरलेला आहे. हा शिलालेख सुमारे ९० सें.मी. लांबीचा आहे. या शिलालेखाचा अक्षरांची उंची साधारणपणे ४ ते ५ सें.मी. आहे. हा लेख बऱ्यापैकी तुटला असल्यामुळे यातील अक्षरे जास्त वाचता येत नाहीत. या शिलालेखाची सुरुवातीची दोन अक्षरे बघितली तर ती 'वृत' अशी दिसतात. असे वि.भि.कोलते. यांनी नमूद केलेले आहे. 'डॉ. वि. भि. कोलते' यांच्या म्हणण्याप्रमाणे या शिलालेखाची हि सुरुवातीची अक्षरे हि 'वृती' अशी असावीत तसेच त्याच्यामागे असणारे 'नि' हे अक्षर नष्ट झालेले असावे. म्हणजेच हा शब्द 'निवृति' असा असावा असे 'डॉ. वि. भि. कोलते' यांना वाटते. 

या शिलालेखाची पुढील दोन अक्षरे हि 'पुत्र' अशी आहेत. त्याच्यानंतर जी अक्षरे आहेत ती 'ज्ञानादे' अशी वाचता येतात. तसेच 'ना' या अक्षरापुढे 'उ' हे अक्षर अत्यंत अस्पष्ट झालेले आहे. म्हणजे त्याठिकाणी 'ज्ञाना(न)देउ' असा शब्द त्याठिकाणी असावा असे 'डॉ. वि. भि. कोलते' यांना वाटते. शिलालेखातील पुढीलशब्द हा 'नाम ...उ' असा आहे. याच्यामधले न वाचता येणारे अक्षर हे 'दे' असावे असे घेतलेल्या ठश्यावरून वाटते. तसेच हा शब्द 'नामदेउ' असावा. तसेच याच्यापुढील अक्षरे हि 'वारी' अशी आहेत. याच्यापुढची अक्षरे अत्यंत स्पष्ट आहेत ती व्यवस्थित वाचता येतात हि अक्षरे 'श्रीधर देव देउ श्री हरीश्चंद्र देवो' अशी ती व्यवस्थित वाचता येतात. या लेखाचे वाचन पुढीलप्रमाणे:-

[नि]वृत (ति) पुत्र ज्ञाना(न)देउ नाम[दे]उ वारी स्त्रीधर देवदेउ स्त्रीहरी[श्चं]द्र देवो.

'हरिश्चंद्रगड' येथे पाचवा शिलालेख ज्या खांबावर आहे त्याच खांबावर अजून एक शिलालेख आहे. या शिलालेखाची लांबी जवळपास ६८ सें.मी असून हा शिलालेख नागरी लिपीमध्ये आहे. या शिलालेखाचा अक्षरांची उंची हि जवळपास ५ ते ६ सें.मी. आहे. हा लेख बराच झिजला असल्यामुळे याची सुरुवातीची अक्षरे नष्ट झालेली आहेत. जी अक्षरे वाचता येतात ती पुढीलप्रमाणे:-

व्वाल्लर्वाकु  सिवा स्त्री मह(हे)षाजचा

या वरील शिलालेखामध्ये हा मूळ शब्द हा 'महेषाचा' असावा यातील 'षाजचा' मध्ये 'ज' हा शब्द चुकून कोरला गेला असेल असे 'डॉ. वि. भि. कोलते' यांचे म्हणणे आहे.     

याच खांबावर अजून एक शिलालेख असून त्या शिलालेखाची लांबी हि ६८ सें.मी. असून हा शिलालेख देखील नागरी लिपीमध्ये लिहिला आहे. या शिलालेखांच्या अक्षरांची उंची हि जवळपास ४ ते ५ सें.मी. असून अक्षरवळण हे ओबडधोबड आहे. या शिलालेखाचे वाचन हे 'डॉ. वि. भि. कोलते' यांनी केले आहे. या शिलालेखाची जी अक्षरे वाचता येतात ती पुढीलप्रमाणे:-

... देवी स्त्रीनंदनाषु(थु) वावि गयनाषु(थु)

'हरिश्चंद्रगड' येथील शेवटचा शिलालेख हा 'हरिश्चंद्रेश्वर' मंदिराच्या डावीकडील भिंतीसमोरच्या ओट्यावरील गणेशमूर्तीच्या मागच्या चौकटीवर माथ्याच्या भागामध्ये हा शिलालेख आहे. या शिलालेखाची लांबी जवळपास ६५ सें.मी. असून हा शिलालेख देवनागरी लिपीमध्ये कोरलेला आहे. या शिलालेखामधील अक्षरांची उंची ही ३ ते ४ सें.मी. यांच्या दरम्यान आहे. या शिलालेखाचे अक्षराचे वळण हे चांगले असून हा शिलालेख साधारणपणे १३ व्या १४ व्या शतकातील असावा कारण याचे अक्षर वळण हे १३ व्या ते १४ व्या शतकातील आहे. या शिलालेखाचे वाचन पुढीलप्रमाणे:-

श्रीदषि(खि)णनाथ का सिष सकपनाथ 

'हरिश्चंद्रगड' येथील हे सर्व शिलालेख जर आपण नीट बघितले तर आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजते ती म्हणजे या शिलालेखांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची नावे आपल्याला कोरलेली दिसून येतात. ह्या शिलालेखांच्या मध्ये जी व्यक्तींची नावे दिसतात ती नावे म्हणजे 'हरिश्चंद्रगड' येथे राहणारे 'योगी' किंवा 'हरिश्चंद्रेश्वर' मंदिरात दर्शनाला आलेले 'भक्त' याबाबत कोणतीही शंका आजिबात नाही. 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेखांमध्ये क्रमांक १ आणि ४ हे शिलालेख खूप महत्वाचे आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या शिलालेखामध्ये 'चक्रपाणी वटेश्वर' हा उल्लेख आढळतो आणि क्रमांक ४ शिलालेखात आपल्याला जे नाव दिसते ते म्हणजे 'चांगा वटेश्वर' हे अत्यंत महत्वाचे नाव दिसून येते. 

प्राचीन महाराष्ट्रामध्ये एक महत्वाचे संत होऊन गेले ते म्हणजे 'चांगा वटेश्वर'. हे 'चांगा वटेश्वर' म्हणजेच 'चांगदेव' नावाचे प्रसिद्ध संत. 'चांगदेव महाराज' यांचे गर्वहरण 'ज्ञानेश्वर' महाराजांची बहिण संत 'मुक्ताबाई' यांनी 'कोरा' असे संबोधून केले. या गर्वहरणानंतर 'ज्ञानेश्वर' महाराजांनी 'चांगदेव महाराज' यांना उद्देशून 'चांगदेव पासष्टी' हा ग्रंथ लिहिला. 'चांगदेव महाराज' यांनी लिहिलेल्या अभंगामध्ये ते स्वत:ला 'चांगा वटेश्वर' आणि 'वटेश्वर चांगा' असेच संबोधले आहे. 'चांगदेव पासष्टी' या ग्रंथामध्ये 'ज्ञानेश्वर महाराजांनी' 'चांगदेव महाराज' यांना जी ओवी  लिहिली आहे ते पुढीलप्रमाणे:-


तया पुत्र तूं वटेश्वराचा । रवा जैसा कापुराचा । चांगया मज तुज आपणयाचा । बोल ऐके ॥ ३७ ॥ 

ओवीचा अर्थ:-

चांगदेवा! ज्या परमात्म्याला वटेश्वर इत्यादि अनेक नामें आहेत; त्याचाच तू पुत्र आहेस. अरे कापराचा कण हा कापूररूपच असतो ना! तसा तू परमात्मस्वरूप आहेस. आत्म्यात आणि परमात्म्यात ऐक्य असते. तुझ्यामाझ्यात तसा ऐक्यभाव कोणत्या रीतींने आहे ते तू आता ऐक! ॥३७॥


गणेशमूर्तीच्या मागच्या चौकटीवर माथ्याच्या भागामध्ये ८ क्रमांकाचा शिलालेख आज देखील स्पष्ट दिसतो.

या वरील ओवीमध्ये आपण नीट पाहिले तर 'चांगदेव महाराज' यांना 'वटेश्वराचा पुत्र' असे म्हटलेले आहे. तसेच संत 'मुक्ताबाई' यांच्या अभंगात  देखील 'चांगदेव महाराज' यांचा उल्लेख आलेला आहे. तो उल्लेख पुढीलप्रमाणे:-

वटेश्वरसूत चांगा अवधूत | मुक्ताई शांतवीत ज्ञानदृष्टी || 
वटेश्वरसुता बोले मुक्ताई 

संत 'मुक्ताबाई' यांनी 'चांगदेव महाराज' यांचा केलेला हा उल्लेख अत्यंत महत्वाचा ठरतो. 'तत्वसार' हा ग्रंथ स्वतः चांगदेव महाराज यांनी लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये ते स्वत:चा उल्लेख जो करतात तो पुढीलप्रमाणे:-

वटेश्वराचा सुतु | चांगा म्हणे अवधुतु

या अभंगावरून हे सिद्ध होते की 'वटेश्वराचा सुतु' आणि 'वटेश्वर सुत' म्हणजेच 'चांगदेव महाराज' हेच आहेत यामध्ये काही शंका उरत नाही. तसेच 'ज्ञानेश्वर महाराज' यांनी 'चांगदेव महाराज' यांना 'चक्रपाणी' असे देखील संबोधलेले आहे. तो उल्लेख पुढीलप्रमाणे:-

एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे । दोन्ही डोळस आरिसे । परस्पर पाहतां कैसें । मुकले भेदा ॥ ६२ ॥

ओवीचा अर्थ:-

अशा प्रकारे ज्ञानदेवांनी या पत्राद्वारे चक्रपाणी(चांगदेव )यांना ज्ञाननिष्ठ (डोळस) केल्यामुळे त्यांचे आरसे(ज्ञानदेव आणि ते स्वतः) परस्परांना पाहताना आपआपसातला भेद विसरून गेले.

या ओविवरून आपल्याला हे समजून येते की 'चांगा वटेश्वर' आणि 'चक्रपाणी वटेश्वर' ही एकाच व्यक्तीची नावे आहेत. या व्यक्ती कोणी भिन्न नाहीत हे यामधून आपल्याला समजते. 'हरिश्चंद्रगड' येथील चौथा शिलालेख जो आहे त्यामध्ये 'चांगा वटेस्वर' असा उल्लेख आलेला आहे. 'चांगा वटेस्वर' म्हणजे 'तत्वसार' ग्रंथाचे निर्माता आहेत. या तत्वसार ग्रंथाच्या शेवटी त्यांनी स्थळाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो तो उल्लेख पुढीलप्रमाणे:-

हरिश्चंद्र नाम पर्वतु | तेथ महादेव भक्तु 
सूरसिद्धीगणींं विख्यातु | सेवेजी जो ||
हरिश्चंद्र देवता | मळगंगा सरिता ||
सर्वतीर्थ पुरविता | सप्तस्थान ||
ब्रम्हस्थळे ब्रम्ह न संडीतु | चंचळ वृक्षु अनंतु 
लिंगी जग्गनाथु | महादेओ ||
ऐसा सर्वांचा समाओ | कळी संसारू दु:खाचा प्रवाहो 
तो देओ मोक्षाचा उत्साओ | शनै: शनै: ||
जो तीर्थांंसि तीर्थ | केदारेसिंं तुकिताति
आणि क्षेत्रिं निर्माती | प्रबंधु हा || (तत्वसार:-१०२९- ३३)

या तत्वसार ग्रंथाच्या श्लोकामधून एक महत्वाची गोष्ट समजते ती म्हणजे 'अकोले' तालुक्यातील 'हरिश्चंद्र पर्वत' म्हणजेच दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगड' हा आहे. याच दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगडावर' आपल्याला 'हरिश्चंद्रेश्वर' मंदिर आपल्याला पाहायला मिळते तसेच 'केदारेश्वर' हे मोठे शिवलिंग देखील 'हरिश्चंद्रगड' येथे आहे. एकंदरीतच 'हरिश्चंद्रगड' येथे मोठ्या प्रमाणात सिद्ध योगी हे राहात असावेत हे वरील शिलालेखांच्यावरून समजते.

'अकोले' तालुक्यातील 'हरिश्चंद्र पर्वत' म्हणजेच दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगड' हा आहे.

वरील शिलालेखांच्यापैकी आपण जर शिलालेख क्रमांक १ आणि शिलालेख क्रमांक ४ जर नीट पाहिले तर त्यामध्ये क्रमांक १ शिलालेखामध्ये आपल्याला 'वटेश्वरनंदनु चक्रपाणी' हे नाव आढळून येते तसेच क्रमांक ४ शिलालेखामध्ये 'वटेश्वराचा चांगा' हे नाव आढळून येते. यामधील 'चक्रपाणी' हे नाव 'चांगदेव महाराज' यांचे दुसरे नाव आहे. तसेच 'चांगा' हे नाव देखील त्यांचेच आहे असे दिसते. तसेच शिलालेख क्रमांक ३ यामध्ये 'वटेश्वर नंदनु' असे नाव दिसते. या शिलालेखात 'चक्रपाणी' याचा 'सुत' म्हणजे शिष्य असल्याचे म्हटले आहे. या शिष्याचे नाव 'विकटदेव' असे आहे. आता हा 'विकटदेव' कोण हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही असे 'डॉ. वि. भि. कोलते' यांचे म्हणणे आहे.

'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ५ हा अत्यंत महत्वाचा आहे. हा शिलालेख देखील 'डॉ. वि. भि. कोलते' यांनी वाचायचा प्रयत्न केला त्यामध्ये त्यांनी या शिलालेखाचे दोन भाग केलेले आपल्याला दिसतात पहिल्या भागाचे वाचन हे '[नि]वृत(ति) पुत्र  ज्ञाना(न)देउ नाम(दे)उ' वारी हे वाक्य आहे. या वाक्यावरून मात्र हे समजते कि महाराष्ट्रातील काही मोठे संत हे देखील 'हरिश्चंद्रगड' येथे त्यांची वारी झाली असावी. यामध्ये एक गोष्ट महत्वाची बघायला पाहिजे म्हणजे आपल्याला वरील शिलालेखातील संदर्भ समजण्यास मदत होते. 'ज्ञानेश्वर महाराज' यांचे बंधू आणि गुरु हे 'निवृत्तीनाथ महाराज' हे होते. 'ज्ञानेश्वर महाराज' यांनी 'निवृत्तीनाथ महाराज' यांच्याकडूनच 'गुरुपदेश' घेतलेला होता. 'ज्ञानेश्वर महाराज' यांनी लिहिलेल्या 'ज्ञानेश्वरी' मध्ये पुढीलप्रमाणे लिहितात:-

ते माहेशान्वयसंभुतेंं | श्रीनिवृत्तीनाथसुतेंं | केले ज्ञानदेवें गीते | देशीकार लेणे ||१८०६|| (अध्याय १८)

ज्ञानेश्वरीमधील या वरील ओवीमध्ये आपल्याला 'निवृत्तीसुत' असा शब्द दिसतो. यामध्ये 'निवृत्तीसुत' म्हणजे 'सुत' म्हणजे 'शिष्य' या अर्थाने उपयोग केला आहे. तसेच याच अर्थाने 'चांगदेव पासष्टी' मध्ये ओवी क्रमांक ३७ मध्ये 'शिष्य' या अर्थानेच पुत्र हा शब्द वापरलेला आहे. 'चांगदेव पासष्टी' मधील ओवी क्रमांक ३७ पुढीलप्रमाणे:-

 तया पुत्र तूं वटेश्वराचा । रवा जैसा कापुराचा । चांगया मज तुज आपणयाचा । बोल ऐके ॥ ३७ ॥

यामध्ये 'तया पुत्र तुंं वटेश्वराचा' यामध्ये 'पुत्र' हा शब्द शिष्य म्हणून वापरलेला आहे. म्हणून वरील 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ५ अत्यंत महत्वाचा आहे. तसेच वरील शिलालेख क्रमांक ५ यामध्ये 'नामदेउ' हे देखील नाव आलेले आहे. हे 'नामदेउ' म्हणजे  दुसरे तिसरे कोणी नसून 'नामदेव महाराज' हे होत. या वरील शिलालेख क्रमांक ५ यावरून मात्र असे दिसते कि निवृतीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज हे सर्वजण 'हरिश्चंद्रगड' येथे नक्की येऊन गेले असावेत. जेव्हा हे मोठे संत 'हरिश्चंद्रगड' येथे आले असतील तेव्हा 'चांगदेव महाराज' हे देखील गडावर असतील. तसे 'हरिश्चंद्रगड' बघायला गेले तर 'हरिश्चंद्रगड' हे  नाथपंथीयांचे एक महत्वाचे ठिकाण असावे. वरील शिलालेखावरून हे मात्र स्पष्ट होते कि निवृतीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज हे सगळेजण 'हरिश्चंद्रगड' येथे येऊन गेलेत हे नक्की. म्हणून 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ५ हा अत्यंत महत्वाचा ठरतो.

तया पुत्र तुंं वटेश्वराचा' यामध्ये 'पुत्र' हा शब्द शिष्य म्हणून वापरलेला आहे.

'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ५ मधील उत्तरार्धात जी नावे आलेली आहेत 'श्रीधरदेव' आणि 'हरीश्चंद्रदेव' ही दोन्ही नावे 'हरिश्चंद्रगडावरील' देवतांची नावे आहेत. आज 'हरिश्चंद्रगडावर' आपल्याला गणपती, शिव-पार्वती, विठ्ठल-रुक्मिणी, देवी ह्या देवता गडावर पाहायला मिळतात. तसेच शिलालेखातील 'श्रीधर' या नावामुळे गडावर एखादे 'विष्णूचे' मंदिर देखील असावे असे वाटते. दुर्गभटक्यांची पंढरी असलेल्या 'हरिश्चंद्रगडावर' एक पुष्करणी आहे त्या पुष्करणीच्या वर जे देवकोष्ठ आहेत त्यामध्ये पूर्वी काही विष्णूमूर्ती होत्या याबाबत गो.नि.दांडेकर आपल्या 'दुर्गदर्शन' या पुस्तकात पान क्रमांक १६९ वर लिहितात ते पुढीलप्रमाणे:-

देऊळ हेंंच गडावरलं एकटंं नवल नव्हे. आश्चर्याचा पहिला भर ओसरल्यावर मग धांंवत चहूंं दिशांना सुटलों. मंदिराचा प्राकार सोडून बाहेर पडलों, तो उजव्या तास हेमाडपंन्ती बांधणीचा एक तलाव दिसला. त्याच्या दक्षिण दिशेला काळ्या पाषाणांत बांधलेले चौदा कोनाडे, अन् अतिशय नवलाची गोष्ट अशी, की त्या चौदा नकशीदार कोनाड्यांंत चतुर्भुज विष्णूच्या चौदा मूर्ती! चारी हातांंतील आयुधांच्या जागा मात्र निरनिराळ्या.

'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ५ 'हरी[श्चं]द्र देवो' हा जो उल्लेख आलेला आहे तो 'हरिश्चंद्रगड' येथील गडदेवता 'हरीश्चंद्रदेव' म्हणजेच 'हरीशचंद्रेश्वर' याचा उल्लेख आहे या 'हरीश्चंद्रदेव' यावरूनच या पर्वताचे नाव 'हरिश्चंद्रगड' असे पडले आहे. तसेच मागील एका लेखामध्ये आपण 'हरिश्चंद्रगड' याचे नाव कसे पडले याबाबत देखील आढावा घेतला तो देखील संदर्भ नक्की पाहावा. 


गडदेवता 'हरीश्चंद्रदेव' म्हणजेच 'हरीशचंद्रेश्वर' याचा उल्लेख आहे.

'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेखांमधून अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला समजते ती म्हणजे 'हरिश्चंद्रगडावरील' शिलालेख क्रमांक १, शिलालेख क्रमांक ३ आणि शिलालेख क्रमांक ४ या सर्व शिलालेखांच्यामध्ये 'वटेस्वर' या नावाचा उल्लेख आलेला दिसतो. यामध्ये शिलालेख क्रमांक ३ या लेखामध्ये 'श्री वटेस्वर शिवस्य प्रणति:' असे म्हटलेले आहे. वटेश्वर म्हणजेच शिव हे यावरून आपल्याला समजायला मदत होते. 'हरिश्चंद्रगडावरील' शिलालेख क्रमांक २ यामध्ये 'गुहेश्वर भैरव' हे 'हरिश्चंद्रगड' येथील देवतेचे नाव असावे किंवा एखाद्या तेथे राहणाऱ्या 'भैरव' या योग्याचे देखील नाव असावे. शिलालेख क्रमांक ६ मध्ये देखील काही नावे आहेत परंतु ती नावे अस्पष्ट झाली असल्याने  त्यांचा अर्थ लागत नाही.

'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ७ या शिलालेखात 'नंदनाथ' तसेच 'गयनाथ' ही नावे आलेली आहेत. तसेच शिलालेख क्रमांक ८ मध्ये 'दखिणनाथ' आणि त्यांचा शिष्य 'सकपनाथ' यांची नावे आलेली आहेत. परंतु या व्यक्ती कोण आहेत हे मात्र 'डॉ. वि. भि. कोलते' यांना हे माहिती नाही असे ते सांगतात. तसेच 'डॉ. वि. भि. कोलते' यांनी एक अनुमान याबाबत असेही काढलेले आहे कि हे कोणी नाथसंप्रदायातील योगी आहेत हे स्पष्ट होते मात्र हे 'गयनाथ' म्हणजे गहिनीनाथ असावेत काय? हा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. वरील सर्व शिलालेख पाहता आपल्याला असे मात्र दिसून येते कि 'हरिश्चंद्रगड' हे नाथपंथीयांचे खूप महत्वाचे ठिकाण होते.

'हरिश्चंद्रगडावरील'  मंदिर परिसर.

'हरिश्चंद्रगडावरील' या आठ शिलालेखांच्या बद्दल आपल्याला आणखी उल्लेख मिळतो तो म्हणजे 'साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची' या 'प्र. के. घाणेकर' यांनी लिहिलेल्या ८४ क्रमांकाच्या 'हरिश्चंद्रगड' या प्रकरणात पान क्रमांक ३२५ येथे आठ शिलालेख असा उल्लेख केलेला असून यामध्ये प्र.के.घाणेकर लिहितात ते पुढीलप्रमाणे:-

याच परिसरात एकंदर आठ शिलालेख आहेत. पहिला आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या प्राकाराच्या दर्शनी भिंतीच्या बाहेरील प्रवेशद्वाराचे डावीकडे. दुसरा व तिसरा केदारेश्वर लेण्याच्या मधल्या दोन खांबावर मध्यभागी. चौथा आहे हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरातील लेण्याच्या दर्शनी डाव्या खांबावर, तर पाचवा, सहावा, आणि सातवा तेथेच आहेत. आठवा मात्र हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या डावीकडील भिंतीला बाहेरील बाजूने ओट्यावरील गणेशमूर्तीच्या मागील चौकटीवर, माथ्याच्या भागात आहे. पहिल्या व चौथ्या लेखांत चांगा वटेश्वराचा म्हणजे योगी चांगदेवांचा उल्लेख आहे.

दुर्गभटक्यांची पंढरी असलेल्या 'हरिश्चंद्रगड' येथे ८ ते ९ लेण्या आहेत.

तसेच शिवनेरी, नाणेघाट, हरिश्चंद्रगड व परिसर या पुस्तकामध्ये प्र.के. घाणेकर यांनी पान क्रमांक १०६ आणि १०७ यामध्ये 'प्र. के. घाणेकर' लिहितात ते पुढीलप्रमाणे:-

एका बाजूला सुटी श्रीगणेशमूर्ती. अलीकडेच तिलाही शेंदूर लावलेला दिसतो. या देवळाच्या पूर्व व दक्षिण दिशांना डोंगर खोदुन गुहा खोदलेल्या. पश्चिम व उत्तर (थोडा भाग) प्राकार भिंत पडून गेलेली. उत्तर प्राकार भिंतीवरील बाहेरील बाजूस प्रवेशद्वाराच्या डावीकडे खूप मोठ्या अक्षराचा अतिशय महत्वाचा शिलालेख:-

चक्रपाणी वटेश्वर:नंदतु तस्य सुतु वीकटदेॐ  

डॉ. रा. चिं. ढेरे यांच्यामते प्राकार भिंतीवर प्रवेशद्वाराच्या उजव्या हातासही काही अक्षरे आहेत. पुढे प्र. के. घाणेकर लिहितात हरिश्चंद्रगडावरील शिलालेखांचे वाचन करण्याचे २-४ प्रयत्न झाले. बहुदा पहिला श्री. गो. नि. दांडेकरांचा. दुसरा 'डॉ. वि. भि. कोलते' यांचा. तिसरा प्रयत्न 'डॉ. रा. चिं. ढेरे' यांचा. 'डॉ. रा. चिं. ढेरे' यांनी त्यांच्या 'चक्रपाणि' या ग्रंथात 'सिद्धपीठ हरिश्चंद्र' या लेखात खूप उहापोह केला आहे. श्री हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या मागील लेण्याच्या दर्शनी दोन खांबांपैकी डाव्या दगडी खांबावर डावीकडील बाजूस एक लेख आहे:-

"(चां) गा वटेस्वराचा"

असे त्या शिलालेखाचे वाचन आहे. याच खांबावर दर्शनी बाजूस आणखी तीन लेख आहेत ते असे:-

१) (नि) वृत (ति) पुत्र ज्ञाना (न) देउ नाम (दे) उ वारी स्त्रीधर देवदेउ स्त्रीहरी(श्चं)द्र देवो 
२) व्वाल्लर्वाकु सिवा स्त्री मह (हे) षाजचा 
३) .....देवी स्त्रीनंदनाषु (थु)वावि गयनाषु (थु)

हे तिनही लेख खुपच अस्पष्ट झालेले आहेत. त्यांचे पूर्ण वाचन करून अर्थ लावणे फार कठीण झाले आहे. या पाच शिलालेखांशिवाय आणखी एक शिलालेख हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या डावीकडील भिंतीला बाहेरील बाजूच्या ओट्यावर बसविलेल्या श्रीगणेशमूर्तीच्या मागील चौकटीच्या माथ्याकडील भागात आहे. 'श्री दषि (खि) णनाथ का सिष सकपनाथ' तसेच या लेखाच्या वरच्या बाजूस 'म (य) नाथ'  उथळ कोरलेली अक्षरे दिसतात.

'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेखांचे जतन होणे गरजेचे आहे. 

दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगड' आज खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेला आहे. डोंगरभटके या किल्ल्यावर येतात कोकणकड्याला भेट देतात 'इंद्रवज्र' बघण्यासाठी अनेक तास घालवतात मात्र हे शिलालेख मात्र फार कमी जण बघतात तसेच त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख यांची आज मात्र दुरवस्था झालेली त्यामुळे ते वाचता नाही आले तरी त्यांचे जतन होणे फार महत्वाचे आहे.  
______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) Gazetteer of The Bombay Presidency  Ahmadnagar:- पान क्रमांक 718, 719, 720, 1884.
२) Notes on The Ahamadnagar Collectorate Indian Antiquery (Year V):- पान क्रमांक ११, W. F. Sinclaire.
३) Cave Temples of India:- पान क्रमांक ४७८, Fergusson James and Burges James, 1880.
४) दुर्गदर्शन प्रकरण ११ हरिश्चंद्र दुर्ग:- पान क्रमांक १७०, १७१, गो.नि.दांडेकर, मृण्मयी प्रकाशन, २००४.
५) महाराष्ट्रातील काही ताम्रपट आणि शिलालेख:- डॉ. वि.भि. कोलते, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, १९८७.
६) सार्थ अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी:- पान क्रमांक १३२,१३६, ओवी ३७, ओवी ६२ ,संत ज्ञानेश्वर महाराज, संपादक ह.भ.प. दत्तराज देशपांडे, सारथी प्रकाशन.
७) तत्वसार:- (१०२९- ३३चांगदेव महाराज.
८) ज्ञानेश्वरी:- अध्याय १८ ओवी १७८४. संत ज्ञानेश्वर महाराज.
९) तीन शोधनिबंध प्रकरण तिसरे चांगदेव राउळ - एक चिंतन:- डॉ. ब्रम्हानंद देशपांडे, परिचय प्रकाशन,
१०) साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची प्रकरण ८४. हरिश्चंद्रगड:- पान क्रमांक ३२५, प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, २०११.
११) शिवनेरी, नाणेघाट, हरिश्चंद्रगड व परिसर:- पान क्रमांक १०६, १०७, प्र. कें. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, २००५.
१२) चक्रपाणि:- पान क्रमांक १६५, डॉ. रा.चिं. ढेरे.            

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा 



  

  

    

                          



  

2 comments:

  1. Amazing article with great insight 😃.. I want you to go through an article on वीरगळ or herostone. You will enjoy it. https://mountaintamers.blogspot.com/2020/04/hero-stones-of-western-ghats.html?m=1

    ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage