दोनशे वर्षांपूर्वीचा 'मुंबई-पुणे' प्रवास


मुंबई-पुणे हा प्रवास संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये काही सुंदर प्रवासांपैकी गणला जातो. मुळातच हा मुंबई-पुणे प्रवास कधीच कंटाळवाणा ठरत नाही याचे मुख्य कारण म्हणजे या रस्त्यावर असलेले निसर्ग सौंदर्य. आजही कित्येक लोकं हे 'डेक्कन क्वीन' या रेल्वेने प्रवास करतात. मुंबई-पुणे या लोहमार्गावरील ही 'डेक्कन क्वीन' ही मुंबईकर आणि पुणेकर यांच्यासाठी लाईफलाईनच आहे परंतु हाच मुंबई-पुणे' प्रवास साधारणपणे २०० वर्षांपूर्वी कसा होता हे बघणे पण फार महत्वाचे आहे.

ही गोष्ट आहे इ.स. १८०९ सालामधली. 'मराया ग्रॅहॅम' नावाची एक पर्यटक ही मुंबईमध्ये आली होती. 'मराया ग्रॅहॅम' हिच्यासोबत त्यावेळेस जवळपास २०० लोकं होती. यामधले सगळे प्रवासी हे मुंबईमधून निघाले नव्हते ते वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले होते. यातले काही ब्रिटिश पर्यटक हे आधी 'मुंबई' येथून निघून 'पनवेल' येथे जाऊन मुक्कामी होते. मराया ग्रॅहॅम हिच्या सोबत जे काही ब्रिटिश पर्यटक होते त्यांनी सगळ्यांनी मुंबई येथून निघण्यापूर्वी त्यांनी सोबत तंबू घेतले, भांडीकुंडी, आणि स्वयंपाकाचे सामान असे घेऊन सोबत काही नोकर चाकर देखील घेतले होते. यातील काही नोकरांना मराया ग्रॅहॅम आणि तिच्या सोबत असलेल्या ब्रिटिश लोकांनी आपले काही नोकर चाकर हे देखील आधी पुढे गेलेल्या लोकांच्या सोबत पुढे पाठवले होते. ते नोकर-चाकर हे देखील 'पनवेल' येथे मुक्कामी होते. या नोकर-चाकरांच्यामध्ये पालखीवाहक, घोडेवाले हे देखील होते.

सोबत असलेले सामान पुढे गेल्यानंतर 'मराया ग्रॅहॅम' आणि तिच्या सोबत असलेले ब्रिटिश सहप्रवासी हे सगळे 'मुंबई' बंदरामध्ये आले आणि बोटीमध्ये बसले आणि या सगळ्यांचा पुण्याकडे प्रवास चालू झाला. मराया ग्रॅहॅम आणि तिच्या सह प्रवाश्यांना 'मुंबई' येथून 'पनवेल' येथे पोहोचण्यास बोटीने तीन तास लागले. या तीन तासांच्या 'मुंबई-पनवेल' समुद्र प्रवासानंतर हे सगळे 'पनवेल' बंदरापासून दोन मैल अंतरावर असलेल्या शेतामध्ये विश्रांतीसाठी थांबले. आधीच आलेल्या नोकर-चाकरांनी 'पनवेल' बंदरापासून दोन मैल अंतरावरील शेतामध्ये आधीच तंबू ठोकून ठेवलेले होते तसेच जेवणाची देखील या सगळ्या लोकांची व्यवस्था करून ठेवलेली होती.


'मराया ग्रॅहॅम' यांचे छायाचित्र. छायाचित्र आंतरजालावरून घेतलेले आहे. 

मराया ग्रॅहॅम आणि तिच्या सोबत असलेले हे प्रवासी 'पनवेल' येथून दोन मैल अंतरावर ज्या शेतात विश्रांतीसाठी थांबले त्या शेताच्या शेजारीच एक आंब्याची बाग होती आणि तलाव देखील होता. मराया ग्रॅहॅम हिने 'पनवेल' येथील तळ्यात आढळणाऱ्या कमळांची (वॉटर लिली) या फुलांची आठवण लिहिली आहे तसेच तिने 'पनवेल' गावामध्ये असलेल्या दुकानांच्या बद्दल देखील आठवण लिहिली आहे त्यामध्ये ती लिहिते की 'पनवेल' येथील प्रत्येक छोट्या मोठ्या दुकानांमध्ये 'तलवारी' आणि 'भाले' लटकवले होते असे वर्णन तिने नोंदवले आहे. तसेच ती असेही म्हणते "काही वर्षांपूर्वी चोरांच्या पासून वाटणाऱ्या भीतीपोटी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी हे तलवार आणि भाले येथे ठेवलेले असणार परंतु आता माणसांच्या ऐवजी रानटी आणि हिंस्त्र जनावरांच्यापासून रक्षण व्हावे यासाठी हे इथे आपल्याला पहायला मिळतात" असे मराया ग्रॅहॅम हिने आपल्या मुंबई-पुणे प्रवासामध्ये आलेल्या अनुभवामध्ये लिहून ठेवले आहे.

मराया ग्रॅहॅम हिचा आणि तिच्या सह प्रवाश्यांचा 'पनवेल' नंतरचे विश्रांतीचे ठिकाण हे 'खोपोली' होते. परंतु हा 'खोपोली' पर्यंतचा प्रवास हा देखील दोन टप्प्यात केला गेला. 'पनवेल' ते 'चौक' हे अंतर रात्रीपर्यंत कापले गेले. या प्रवासाचे वर्णन ती लिहिताना आपल्या 'मुंबई-पुणे' प्रवासाच्या अनुभवामध्ये ती लिहिते की "घाटाचे आणि दऱ्याखोऱ्यांचे सौंदर्य मावळत्या सूर्याच्या साक्षीने पाहताना खूप मजा वाटली". जेव्हा मराया ग्रॅहॅम आणि तिचे सह प्रवासी हे सगळे 'चौक' येथे पोहोचले तेव्हा रात्री बराच उशीर झाला होता. तसेच मराया ग्रॅहॅम आणि सह प्रवासी हे 'चौक' गावामध्ये पोहोचले तो दिवस बाजाराचा दिवस होता. त्या रात्री 'चौक' गावामध्ये मराया ग्रॅहॅम हिने जवळपास पाचशे बैलगाड्या 'चौक' गावामध्ये होत्या हे मराया ग्रॅहॅम हिने पाहिले. तसेच रात्री अंधार पडल्यानंतर बाजारसाठी आलेल्या लोकांच्या पेटलेल्या चुली आणि शेकोट्या ह्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेले घोडे आणि तंबू आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या वृक्षाच्या अंधारात सळसळणाऱ्या फांद्या हे दृष्य मराया ग्रॅहॅम हिला खूप सुंदर वाटले.


'मराया ग्रॅहॅम' यांनी इ.स. १८०९ मध्ये काढलेले 'कार्ले' लेणी मधील चैत्यगृहाचे स्केच.

रात्री उशिरा जेवण करून जेव्हा मराया ग्रॅहॅम आपल्या तंबूमध्ये झोपेसाठी परतायला लागली तेव्हा तिला ती ज्याठिकाणी तंबूमध्ये जेवली तो तंबू काढताना पाहिला. याचे मुख्य कारण म्हणजे पहिले जे लोकं तिथे पोहोचले होते ती सगळी लोकं पुढच्या प्रवासाला निघालेली होती. जेव्हा मागची ही ब्रिटिश लोकं पुढच्या विश्रांती टप्प्यावर येऊन पोहोचतील तेव्हा त्या लोकांसाठी 'ब्रेकफास्ट' तयार ठेवण्याची जबाबदारी या सगळ्या पुढे गेलेल्या लोकांवर होती. जेव्हा दुसऱ्या दिवशी मराया ग्रॅहॅम आणि सह प्रवासी हे पुढच्या प्रवासाला निघाले तेव्हा मराया ग्रॅहॅम हिच्या पालखीमधला थर्मामीटर ६८ फॅरनहिट तापमान दाखवत होता. 'खोपोली' येथे पोहोचेपर्यंत सूर्य मध्यावर येऊन तळपत होता, तेव्हा तापमान हे २२ डिग्री ने वाढले होते असे मराया ग्रॅहॅम आपल्या प्रवास वर्णनामध्ये लिहून ठेवते.

'खोपोली' येथून निघून घाट चढून प्रवास करायला मराया ग्रॅहॅम हिला चार तास लागले. परंतु हा प्रवास फक्त १२ मैलांचा झाला. परंतु या सगळ्या प्रवासाचा तिने मनमुराद आनंद घेतला. घाटामधून प्रवास करताना आणि घाटाचे सौंदर्य न्याहाळताना आपल्याला स्कॉटलंड येथील निसर्गरम्यतेची आठवण झाली असे मराया ग्रॅहॅम हिने आपल्या प्रवास वर्णनात लिहिलेले आहे. दिनांक १४ डिसेंबर रोजी 'पनवेल' येथून निघालेली ही सगळी ब्रिटिश मंडळी दिनांक १६ डिसेंबर रोजी खोपोली येथे पोहोचली. मराया ग्रॅहॅम आणि मंडळी यांचा पुढचा टप्पा होता तो 'कार्ला लेणी' येथे तो १७ डिसेंबर रोजी गाठला गेला. मराया ग्रॅहॅम पालखी मध्ये बसून 'कार्ले लेणी' पाहायला गेली. तेव्हा दुपारचे १२ वाजले होते. 'कार्ले लेणी' पाहात असताना मराया ग्रॅहॅम हिला पुण्यावरून आलेला चोपदार भेटला.


'मराया ग्रॅहॅम' यांनी इ.स. १८०९ साली काढलेले 'कार्ले' लेणीचे स्केच. 

पुण्यावरून आलेल्या या चोपदाराला पुण्याच्या तत्कालीन ब्रिटीश रेसिडेंट याने पाठवले होते. मराया ग्रॅहॅम आणि तिच्या सोबत असलेले ब्रिटिश प्रवासी येणार हे समजल्यामुळे रेसिडेंट रसेल स्वतः 'कार्ले' येथे तिच्या स्वागताला आलेला होता. रेसिडेंट रसेल याने सुद्धा 'कार्ले लेणी' बघितली नव्हती म्हणून रसेल हा देखील या मंडळीच्या मध्ये सामील झाला. दिवसभर 'कार्ले लेणी' इथे थांबून दुसऱ्या दिवशी हे सगळे लोकं 'तळेगाव' येथे पोहोचले. 'तळेगाव' येथे एका तळ्याकाठी त्यांनी आपले तंबू टाकले.

१९ डिसेंबर रोजी मजल दरमजल करत मराया ग्रॅहॅम आणि मंडळी 'चिंचवड' येथे पोहोचले. 'मोरया गोसावी' यांच्या शिष्याचे - १२ वर्षांच्या मुलाला गणेश देव मानले जात असे त्याचे त्याचे मराया ग्रॅहॅम हिने दर्शन घेतले ते देखील नदीच्या काठावर असलेल्या प्रशस्त वास्तूमध्ये 'देव वाड्यामध्ये'. ब्राम्हण दुभाष्याच्या मदतीने 'देव' मराया ग्रॅहॅम हिच्याशी बोलले. देव वाड्यापालिकडच्या नदीच्या काठावर मराया ग्रॅहॅम आणि मंडळी तंबू ठोकून थोड्यावेळ विश्रांतीसाठी राहिली आणि असा सगळा टप्याटप्याने मुंबई-पुणे प्रवास मराया ग्रॅहॅम आणि मंडळी यांनी केला. जवळपास पाच दिवसांनी म्हणजे १९ डिसेंबर रोजी मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर बांधलेल्या रेसिडेंट याच्या निवासस्थानी मराया ग्रॅहॅम आणि मंडळी पोहोचली.


'मराया ग्रॅहॅम' यांनी इ.स. १८०९ मध्ये मुंबई वरून पुण्याला येण्याच्या आधी घारापुरी येथे भेट दिली होती तेव्हा काढलेले 'घारापुरी' लेणीमधील 'सदाशिव' याचे स्केच.   

या सगळ्या मराया ग्रॅहॅम हिने लिहिलेल्या वर्णनावरून आपल्याला मुंबई-पुणे हा प्रवास किती खडतर होता हे समजते. परंतु त्यापूर्वी मुंबई-पुणे प्रवास कसा असेल याची कल्पना आपण केलेलीच बरी. या इ.स. १८०९ च्या मराया ग्रॅहॅम हिने लिहीलेल्या प्रवास वर्णनावरून आपल्याला हे मात्र नक्की समजते कि आज आपण जो मुंबई-पुणे प्रवास इतक्या सहजतेने करत आहोत तोच प्रवास करायला २०० वर्षांपूर्वी जवळपास पाच दिवस लागत होते यावरून बदलत्या टेक्नोलॉजीला मनुष्य किती पटकन स्वीकारतो हे समजायला देखील आपल्याला मदत होते.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) A Journal of Residence In India:- Maria Graham, George Ramsay and Company, 1813.

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

एक छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे. 
लिखाण आणि छायाचित्रे © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा  

16 comments:

  1. अनुराग जी खूप सुंदर आणि तंतोतंत वर्णन केले आहे मरीमय यांनी।

    ReplyDelete
  2. छान माहिती 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  3. अशी प्रवास वर्णने देशी प्रवाश्यानी लिहिली नसल्याने दीडशे वर्षांपूर्वीचे लोकजीवन, राजे, सरदार,परदेशी आक्रमणे याविषयी सविस्तर व खात्रीलायक माहिती मिळत नाही, पण परदेशी प्रवाशांनी अनेक नोंदी ठेऊन आपल्यावर उपकार केले आहेत👍

    ReplyDelete
  4. सर , आपली लेखनशैली खूप छान आहे

    ReplyDelete
  5. काळाच्या ओघात आपले अस्तित्व गमावून बसलेत काही ऐतिहासिक गड आणि किल्ले.अशा लोकांनी त्यांना पहायला मिळालेल्या वास्तूंची नोंद रंजक आहे. आपल्याकडे अशी निसर्ग चित्रे काढणारे नव्हते असे वाटत नाही पण त्यांच्या कलेची जपणूक व कदर केली जात नसावी.

    ReplyDelete
  6. नंदकुमार सावंत.September 10, 2020 at 10:11 AM

    परदेश पर्यटन आणि तेही 200 वर्षा पूर्वी, सगळं अजबच.
    200 वर्षा पूर्वी पनवेल, खंडाळा, लोणावळा ,तळेगाव म्हणजे घनदाट झाडी असणार.पनवेल पुणे रस्ता म्हणजे पाऊल वाट असावी असे वाटते. मुंबई पनवेल प्रवास ज्या अर्थी बोटी ने केला त्याअर्थी मुंबइ पनवेल रस्ता नव्हता असे दिसते.
    अनोखे प्रवास वर्णन पण सुंदर. पेन्सिल स्केटचेस उत्तम,

    ReplyDelete
  7. नंदकुमार सावंत.September 10, 2020 at 10:22 AM

    अनोखे पण उत्तम प्रवास वर्णन. उत्तम पेन्सिल स्केचेस.
    200 वर्षा पूर्वी परदेश प्रवास सर्वच अनोखे.ज्याअर्थी
    मुंबई पनवेल बोटीने प्रवास त्याअर्थी रस्ते म्हणजे पाऊल वाट असावी असे वाटते.पनवेल. खंडाळा, लोणावळा , कार्ला घनदाट झाडी मधून चालत, घड्यावरून प्रवास खूपच अविस्मरनिय.छान.

    ReplyDelete
  8. खुपच छान लेखन

    ReplyDelete
  9. थोडक्यात पण छान प्रवास वर्णन लिहिले आहे. तत्कालीन परिस्थिती ह्या प्रवास वर्णनाने दृश्यमान होते. स्केचेस पण खूप छान आहेत.👌🏽🙏🏽

    ReplyDelete
  10. मराया ग्रॅहॅम चे प्रवास वर्णन छान आहे तसेच काढलेली चित्रे ही सुंदर आहेत. पर्यटन करणे आणि त्याच्या सचित्र नोंदी करणे ही सवय कौतुकास्पद आहे. आपण ह्या नोंदी प्रसिद्ध केल्या आणि आम्हा सर्वांना इतिहासात डोकावण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  11. मराया ग्रॅहॅम चे प्रवास वर्णन छान आहे तसेच काढलेली चित्रे ही सुंदर आहेत. पर्यटन करणे आणि त्याच्या सचित्र नोंदी करणे ही सवय कौतुकास्पद आहे. आपण ह्या नोंदी प्रसिद्ध केल्या आणि आम्हा सर्वांना इतिहासात डोकावण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  12. Very interesting.Thanks to Maraya Graham.

    ReplyDelete
  13. धन्यवाद सर २००वर्षापूर्वीचा प्रवास आम्हाला विनासायास घडवुन आणला।आचार्य जिनभद्रसुरी यानी ही २०तीर्थांची यात्रा प्राकूत,संस्क्रुत भाषेत घडवुन आणली आहे।वासुदेव हिंडी नामक पुस्तकातही जगावेगळी सफर वर्णिली आहे।आपले सारे संशोधनावस्थेत आहे।

    ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage