उनव्हरे गावातील 'गरम पाण्याची कुंडे'

 

महाराष्ट्राला जसा किल्ले, लेणी, मंदिरे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे तसाच भौगोलिक आश्चर्यांंचा वारसा देखील लाभलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये हा वारसा वनस्पती, डोंगर, नद्या, गरम पाण्याचे झरे यांच्या रुपाने पहायला मिळतो. निसर्गातील अश्या वैविध्य आणि विचित्र गोष्टींचे आकर्षण मानवाला फार मोठ्या प्रमाणात असते. असेच एक निसर्ग नवल लपलेले आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातील 'खेड' तालुक्यापासून ३० किलोमीटर अंतरावर 'उनव्हरे' गावामध्ये. या 'उनव्हरे' गावामध्ये आपल्याला 'गरम पाण्याची कुंडे' आहेत. 


'उनव्हरे' गावातील लोकांनी 'गरम पाण्याची कुंडे, उनव्हरे' असा बोर्ड देखील लिहिला आहे.


तसे पहायला गेले तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही 'गरम पाण्याची कुंडे' फारशी प्रसिद्ध देखील नाहीत. अश्या भौगोलिक वारस्याला प्रसिद्धी मिळणे खरोखरच फार गरजेचे आहे. 'उनव्हरे' गावामध्ये जाण्यासाठी आपली स्वतःची गाडी असेल तर कधीही उत्तम. 'वाकवली' गावापासून ही 'गरम पाण्याची कुंडे' खुपच जवळ आहेत. 'वसिष्ठी' नदीच्या एका ओढ्याच्या तीरावर जवळपास ६ कुंडे आहेत. 'उनव्हरे' गावातील लोकांनी आता या गरम पाण्याच्या कुंडांच्या भोवती व्यवस्थित कुंपण घालून कमानीवर 'गरम पाण्याची कुंडे, उनव्हरे' असा बोर्ड देखील लिहिला आहे त्यामुळे ही गरम पाण्याची कुंडे अगदी सहज सापडतात.


'उनव्हरे' येथील या गरम पाण्याच्या कुंडातील तापमान साधारणतः ४८ ते ५० सें च्या दरम्यान असते. ह्या निसर्गनिर्मित कुंडामधील पाणी हे गंधकयुक्त आहे. या पाण्याने आंघोळ केली असता आपल्या त्वचेचे रोग बरे होतात. या गरम पाण्याच्या कुंडांमध्ये रिकाम्यापोटी जाऊ नये अन्यथा चक्कर येणे किंवा हातापायात गोळे येणे अश्या अडचणी येऊ शकतात. संपूर्ण खबरदारी घेऊन कुंडामध्ये मनसोक्त जलतरणाचा आनंद घ्यावा. 


संपूर्ण खबरदारी घेऊन 'गरम पाण्याच्या कुंडामध्ये' मनसोक्त जलतरणाचा आनंद घ्यावा.


असे हे अत्यंत सुंदर असलेले अनवट 'उनव्हरे' गावातील 'गरम पाण्याची कुंडे' नक्कीच पाहण्यासारखी आहेत. अश्या या अनवट वाटेवरच्या भौगोलिक विविधतेने नटलेल्या ठिकाणी जाणे म्हणजे पर्वणीच असते. तसेच आपल्या कुटुंबाबरोबर जाऊन एका सुंदर आडवाटेवर वाटेवर फिरून निसर्गाच्या भौगोलिक आश्चर्याचे दर्शन घेऊन आपण आपल्या एक सफल यात्रेची सांगता करू शकतो.

______________________________________________________________________________________________

कसे जाल:-

पुणे - भोर - वरंधा घाट - महाड - पोलादपूर - खेड - उनव्हरे. 

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्र © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा   


No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage