विजयनगरचा 'सम्राट आलिया रामराया याचे मस्तक आणि साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज'

 

आळीया या शब्दाचा अर्थ म्हणजे जावई हा आलिया रामराया कृष्णदेवरायाचा जावई होता. अच्युतदेवराया याला पदच्युतकरून याने विजयनगरच्या साम्राज्याची सूत्रे स्वीकारली आणि राज्यकारभार पाहू लागला. याच रामरायाची बायको हिने आदिलशहाला स्वतःचा भाऊ मानले होते ज्याने नंतर तालिकोटच्या लढाईमध्ये भाग घेतला. या आलिया रामरायाने पाचही शाह्या यांच्यात एकमेकांच्या विरुद्ध भांडण लावण्याचा प्रयत्न देखील केला परंतु त्याला त्यात फारसे यश मिळाले नाही.


जेव्हा कुतुबशाह आणि निजामशाह यांचे संबंध गोवळकोंडा येथे जोडले जात होते तेव्हा याने आदिलशाहला हाताशी धरून अहमदनगरवर जोरदार हल्ला केला आणि सगळे अहमदनगर अक्षरशः बेचिराख केले याची वर्णने समकालीन संदर्भातुन आपल्याला पाहता येतात. परंतु नंतर हीच सगळी गोष्ट लक्षात ठेवून हुसेन निजामशहा याने सगळ्या शाह्यांना धर्माच्या नावाखाली एकत्र आणले. सोलापूरच्या किल्ल्यात निजामशाही आणि आदिलशाही यांचे लग्नसंबंध जोडले गेले आणि तेथून या शाह्यांनी एकत्र येऊन युद्धाला निघाल्या. विजयनगरचे सैन्य आणि पाचही शाह्या यांचे सैन्य ज्याला आज सगळे 'राक्षसतागडी' म्हणून ओळखतात जे की ही दोन गावे आहेत रक्कसगी आणि तंगडकी जी आज कर्नाटकमध्ये पवित्र तीर्थक्षेत्र कुडल संगमच्या जवळ आहेत.


या संपूर्ण परिसरात विजयनगरविरुद्ध तालीकोटचे युद्ध झाले आहे.


येथे ही पाच शाह्या विरुद्ध एक हिंदू साम्राज्य ही लढाई झाली सुरुवातीला विजय जवळ आला होता परंतु आलिया रामराया याच्या सैन्यातील मुस्लिम सैन्य फिरले आणि आतल्या आत गोष्टी फिरायला सुरुवात झाली त्यातच हुसेन निजामशाह याच्याविरुद्ध लढण्यासाठी समोरील मधली फळी सगळी आलिया रामरायाने लढण्याचे ठरवले होते परंतु दुर्दैवाने याच्या समोरील फळी लढाईच्या अंदाधुंदीत उघडी पडली तेवढ्यात निजामशाहीतील रुमी खान ज्याने मुलुख मैदान तोफ तयार केली हा आपल्या गुलाम अली या हत्तीवरून तेथे आला आणि त्याला जसे समजले की हा राजा आहे त्याने त्याच्या हत्तीला आदेश दिला आणि सोंडेत पकडून त्याला सरळ हुसेन निजामशहाच्या छावणीत घेऊन आला त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता हुसेन निजामशहा याने आलिया रामराया याचे डोके धडापासून वेगळे केले.


यानंतर हे डोके भाला रोवून संपूर्ण रणभूमीवर नाचवले गेले विजयनगरच्या जवळपास पाच लाखांच्यावर सैन्य मारले गेले आणि पंधरा दिवसांनी या शाह्यांच्या सैन्याने आपला मोर्चा थेट वळवला तो विजयनगरकडे आणि येथे पोहचून विजयनगर येथे जे काही केले ते आज सगळे अवशेष रूपामध्ये आपल्या समोर शिल्लक आहे. एवढे मोठे असलेले राजधानीचे शहर एक वर्षभर जळत होते....!!!

तालीकोट लढाईमध्ये ज्या हत्तीने विजयनगरचा सम्राट आलिया रामराया याला पकडले त्याचे स्मारक.


महत्वाच्या टिपा:-

१) तालिकोटची लढाई २६ जानेवारी १५६५ मध्ये झाली


तालीकोटच्या लढाईचे तारीफ ई हुसेनशाहीमध्ये काढलेले चित्र.  

२) छायाचित्र १ आणि २ आलिया रामराया याला मारल्यानंतर त्याच्या डोक्याच्या तालिकोट येथील विजयाच्या मातीच्या रेप्लिका तयार करून या मातीच्या रेप्लिका अहमदनगर, गोवळकोंडा याठिकाणी पाठवण्यात आल्या तर विजापूर येथे मूळ डोके बरेचवर्ष हे विजापूरच्या दरवाज्यावर आतून खोवून बसवले होते.


आलिया रामराया याला मारल्यानंतर त्याच्या डोक्याची केलेली मातीची रेप्लीका विजापूर म्युझियम.


३) छायाचित्र ३ हे हुसेन निजामशाह याच्या काळात बनवलेल्या तारीफ ई हुसेनशाही या समकालीन ग्रंथातील असून त्यामध्ये तालिकोट येथील संपूर्ण युद्धाचा प्रसंग चित्रित केलेला आहे यामध्ये हुसेन निजामशहा याने आलीया रामरायाला कसे मारले हे चित्रित केले आहे. या ग्रंथाची प्रत तुम्हाला हवी असेल तर भारत इतिहास संशोधक मंडळ येथे ही प्रत तुम्हाला मिळेल. ग्रंथ हा फारसी मध्ये आहे.


साताऱ्याचे शाहू महाराज यांनी हे डोके विधीपूर्वक विजापूर येथील ताजबावडीमध्ये विसर्जन केले.


४) छायाचित्र ४ विजापूर येथील हे आलिया रामरायचे डोके कित्येक वर्षे दरवर्षी रक्ताच्या रंगाच्या पाण्यात बुडवून त्याच्यावर त्याकाळात काही सोल्युशन लावून दरवर्षी विजापूरमध्ये तालिकोट विजयदिन म्हणून संपूर्ण विजापूरमधून हे डोके फिरवले जायचे आणि उत्सव साजरा केला जात असे. साताऱ्याचे शाहू महाराज जेव्हा विजापूरला भेट द्यायला गेले तेव्हा त्यांना ही डोक्याची अवहेलना बघवली गेली नाही आणि त्यांनी हे डोके विधीपूर्वक विजापूर येथील ताजबावडीमध्ये विसर्जन केले.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:- 

१) तारीफ ई हुसेनशाही:-  १५६५, भारत इतिहास संशोधक मंडळ.
२) The Aravidu Dynasty of Vijayanagara, Vol. I:- by Heras, Henry Rev.; Temple, Richard Carnac Sir Publication date 1927 
      
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

लिखाण आणि छायाचित्रे  © २०२४  महाराष्ट्राची शोधयात्रा


1 comment:

  1. उपयुक्त माहीती

    ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage