सासवडमधील पुरंदरेवाड्याजवळील 'गद्धेगाळ'

 

आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी इतिहासाच्या खुणा सांगणारी शिल्पे, मूर्ती, मंदिरांचे अवशेष, वीरगळ, सतीशिळा, गद्धेगाळ अश्या विविध गोष्टी आपल्याला विखुरलेल्या आढळून येतात. महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये हा वारसा विखुरलेला असून आजही हा वारसा जपणे गावातली लोक विविध प्रकारे करत असतात. असेच आपल्या महाराष्ट्रातील एक प्राचीन गाव म्हणजे पुण्यापासून हाकेच्या अंतरावर वसलेले सासवड हे गाव वाडे, मंदिरे शिल्पे आपल्या कुशीमध्ये बाळगून आहे. पुरंदर किल्ल्यासारखा किल्ला या प्राचीन सासवड गावाचा पाठीराखा असून ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू सोपान काका यांची समाधी देखील याच ऐतिहासिक सासवड गावामध्ये आहे. तसेच सासवड मध्ये बाळाजी विश्वनाथ भट, बाजी पासलकर, सरदार गोदाजी जगताप यांच्या देखील समाधी आपल्याला पहावयास मिळतात. तसेच सासवड हे गाव म्हणजे आचार्य प्र. के. अत्रे यांचे जन्मस्थान आणि गाव. त्यामुळे सासवड शहराचा सगळा परिसर ऐतिहासिक गोष्टींनी बहरून गेलेला आपल्याला पहावयास मिळतो.


याच सासवड शहरामध्ये सरदार पुरंदरे यांचा प्रशस्त वाडा आपल्याला पहावयास मिळतो. या वाड्याला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. तसेच सध्या हा वाडा बंद असतो कारण वाड्याचे सध्या नूतनीकरण चालू असून या वाड्याच्या अगदी अलीकडे आपल्याला वाड्याच्या आवारामध्ये बाहेरच्या बाजूस असलेले गणपतीचे मंदिर पहावयास मिळते याच गणपतीच्या मंदिराच्या बाहेर डाव्या हाताला आपल्याला एक शेंदूर फासून ठेवलेला दगड पहावयास मिळतो. हा दगड जर आपण नीट पाहिला तर त्याच्यावरील गाढव आणि स्त्री संकर असलेले शिल्प आपल्याला लगेचच समजते. यावरून हा दगड गद्धेगाळ असल्याचे लगेच लक्षात येते. 


सासवडगावामध्ये असलेला 'गद्धेगाळ' 

तसे पहावयास गेले तर सासवड हे गाव प्राचीन असून या गावाचे महत्व प्राचीन काळामध्ये मोठे होते नक्कीच लक्षात येते. सोपान काकांची येथे असलेली समाधी तसेच सासवड परिसरात असलेली पोखर लेणी असूदे नाहीतर नारायणपूर येथील नारायणेश्वर मंदिर असूदे हे सर्व प्राचीन काळाची साक्ष देणाऱ्या खुणा आहेत. त्यामुळे सासवड येथील काळभैरवनाथाचे मंदिर देखील जुने आहे नंतरच्या काळामध्ये आपल्याला त्याचे नूतनीकरण आणि जीर्णोद्धार केलेला आपल्याला विविध उल्लेखातून मिळतात. सासवड गावामध्ये असलेला हा गद्धेगाळ बहुदा काळभैरवनाथ मंदिरासाठी दिला असावा असे वाटते.


तसे पहावयास गेले तर हा गद्धेगाळ साधारणपणे दोन फुट उंचीचा असून या गद्धेगाळावर आपल्याला स्त्री आणि गाढवाचे संकर कोरलेले पहावयास मिळते. यातील वरची शिळा हि तुटलेली असून याच्यावर आपल्याला कोणताही शिलालेख अथवा चंद्र आणि सूर्य पहावयास मिळत नाही. त्यामुळे त्याच्यावरील कालखंड आपल्याला समजत नाही परंतु हा गद्धेगाळ बहुदा तेराव्या शतकाच्या सुरुवातीस कोरलेला असावा असा अनुमान आपण इथे नक्कीच काढू शकतो. तसेच गद्धेगाळ म्हणजे काय हे देखील समजून घेणे आपल्याला गरजेचे ठरते. लेखामध्ये शापवचने घालण्याची पद्धत ही साधारणपणे ५ व्या शतकापसून सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. ही शापवचने जो कोणी ताम्रपट किंवा शिलालेखामध्ये लिहून किंवा कोरून दिलेले दान मोडेल किंवा त्याला बाधा आणेल अश्या व्यक्तीला ते उद्देशून असते आणि त्याची रचना साधारणपणे सारखी असते. या शापवचनामध्ये फरक पडला तर वाचनाच्या संख्येत किंवा शब्दांमध्ये बदल होतो बऱ्याचदा सर्व लेखामधून पुढील श्लोक आपल्याला वाचायला मिळतो.    


सासवडमधील गाढव आणि स्त्री संकर असलेले शिल्प आपल्याला लगेच कळते.

स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरां।

षष्टी वर्षसहस्त्राणी विष्टायां जा यते कृमी:।।


या श्लोकाची रचना शापवचनाच्या कामी केली जाते. बऱ्याचदा मराठी लेखामधून हेच शापवचन आपल्याला आढळून येते. शिलाहारांच्या आणि यादवांच्या लेखातून शापवचने मराठी भाषेत घालण्याची प्रथा रूढ झालेली आपल्याला पहायला मिळते आणि यातून 'गद्धेगाळ' म्हणजेच (ass-curse) या नावाने प्रसिद्ध असणारे वचन पुढे रूढ झालेले आपल्याला दिसते.  गद्धेगाळ ही कधी शब्दरूपाने किंवा चित्ररूपाने किंवा शब्द आणि चित्र अशा रूपांनी व्यक्त होते. म्हणूनच सासवड येथील गद्धेगाळ अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही सासवड परिसरामध्ये फिरायला जाल तेव्हा पुरंदरे वाड्याच्या बाहेर असलेला हा गद्धेगाळ नक्कीच बघा हा मूक वारसा आपले नक्कीच स्वागत करेल.       

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:- 

१) प्राचीन मराठी कोरीव लेख:- डॉ. शं. गो. तुळपुळे
२) यादव कालीन मराठी भाषा:- डॉ. शं. गो. तुळपुळे
३) गधागाळ:- भा.रा.भालेराव (भारत इतिहास संशोधक मंडळ पंचम संमेलन वृत्तांत)

कसे जाल:-
पुणे - स्वारगेट - हडपसर - सासवड. 
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे  © २०२२  महाराष्ट्राची शोधयात्रा

1 comment:

  1. वेगळीच माहीती वाचायला मिळाली!!

    ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage